मुंबई : सजावटीच्या सामानापासून खाऊपर्यंत आणि पत्री-फुलांपासून सोन्याचांदीच्या गणपतीच्या दागिन्यांपर्यंत मनासारखी खरेदी झाल्यानंतर गणेशभक्त गणेश आगमनासाठी सज्ज झाले आहेत. शनिवार-रविवारी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्ती मंडपांमध्ये विराजमान झाल्यानंतर सोमवारी दुपारनंतर घरोघरी गणेश आगमनाचीही लगबग सुरू झाली.अनेक घरांमध्ये आज, मंगळवारी गणेश चतुर्थीलाच गणेशमूर्ती आणण्यात येईल. यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना परवानगी असल्याने गल्लोगल्ली सुरू असलेल्या गणेश मूर्तीच्या मंडपांमध्ये झुंबड उडालेली होती. मंगळवारी दुपारपर्यंत गणेश चित्रशाळांमधील गर्दी कायम राहील. सार्वजनिक गणपतीबरोबरच घरगुती गणपती आगमनही ढोलताशांच्या गजरात करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढताना दिसत आहे. याचाच प्रत्यय सोमवारीही ठिकठिकाणी आला. इमारतींमधील गणपतींच्या आगमनाचा एकत्र सोहळा साजरा करतानाही ढोलताशाच्या पथकांना निमंत्रण दिले जात आहे. त्यातच गुजरातीबहुल भागामध्ये सजवलेल्या इलेक्ट्रिक रथातूनही गणेशमूर्तींचे आगमन होत होते. लेझीमच्या तालात विद्यार्थ्यांनी आगमनाचा उत्साह वाढवला. यंदा शाळा, कॉलेजांमध्ये गणेशमूर्ती कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. तेधूनही सजवलेल्या, रंगवलेल्या मूर्ती विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी नेल्या.बाजार फुललेपूजेच्या सामानापासून, फळे, केळीचे खांब, तोरणे घेण्यासाठी बाजारामध्ये लगबग होती. भाजीवाले, फुलवाले यांना भाविकांनी आधीच सांगून ठेवल्याप्रमाणे जास्वंद, दुर्वा, केवडा घेण्यासाठीही गर्दी होती. त्यातच ऋषीपंचमीच्या भाजीसाठीही अनेकांनी आधीच तजवीज करून ठेवली होती. आयत्या वेळी अळू, माठ, सुरण, दोडका या भाज्या उपलब्ध न झाल्यास धावपळ नको यासाठीही नोंदणी करून ठेवली, तर ऑनलाइन पद्धतीनेही भाज्या मागवण्याचे प्रमाण अधिक होते.ऑनलाइन मागणीनोकरदार महिलांसाठी सोयीचे म्हणून उकडीच्या मोदकासाठी पोळी-भाजी केंद्रांवर, घरगुती जेवणाचे डबे पुरवण्याऱ्या महिलांकडे ओल्या नारळाचा चवही उपलब्ध होतो. याचीही ऑनलाइन आणि ऑफलाइन मागणी सुरू होती. काही शाळांमध्येही गणेशोत्सव साजरा होतो. त्यासाठी गणेश चतुर्थीच्या सुट्टीच्या आधी हरतालिकेला गणपती आगमन करण्यात आले.मूर्तींची भव्यता अधिककरोना, करोनानंतरची आर्थिक ओढाताण याचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावर अजिबात नसल्याचे जाणवत आहे. तसेच राजकीय पक्षांनीही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडळांसाठी आर्थिक मदत केल्याने मूर्तीची भव्यता, देखावे, सजावट यांचा दिमाख अधिक जाणवत आहे. याचेच प्रतिबिंब लहानमोठ्या मंडळांच्या गणेशोत्सवामध्येही पडलेले आहे. दीड दिवसांच्या विसर्जनानंतर हळूहळू या सार्वजनिक मंडळातील गणपतीच्या दर्शनासाठीही गर्दी वाढत जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here