रतलाम-गोध्रा विभागातील अमरगड ते पंचपिपलिया दरम्यान पावसामुळे रेल्वेरुळांखालील माती वाहून गेली आहे. सध्या या विभागातील रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे काम ५०० श्रमिकांसह वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत युद्धस्तरावर सुरू आहे. पावसामुळे ४०हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुमारे १०० रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम झाल्याने रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले.
राजधानी, वंदे भारत, तेजस, शताब्दी या रेल्वेगाड्यांसह डहाणू-विरार मेमू देखील रद्द झाल्याने उत्सवानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला. रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेगाड्या खोळंबल्याने त्याचा परिणाम रेल्वे प्रवाशांवर झाला. अनेक ठिकाणी रेल्वे प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहाची मुलभूत सुविधाही उपलब्ध झाली नसल्याची तक्रार अडकलेल्या प्रवाशांनी केली. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गिकांवरून पाणी वाहत असल्याने नियोजित मार्गांवरील रेल्वेगाड्या पश्चिम रेल्वेने भोपाळ-इटारसी-खंडवामार्गे वळविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानिमित्त पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष बसगाड्या चालवल्या होत्या.
आज, उद्या मेल-एक्स्प्रेस वेळेत बदल
पावसामुळे आज, १९ आणि उद्या, २० सप्टेंबर रोजी धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आल्याने पश्चिम रेल्वेच्या वेबसाइटला आणि रेल्वेच्या समाजमाध्यमाला भेट देऊनच पुढील प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.