कोल्हापूर: ‘करोना संसर्गाच्या काळात राज्य सरकारची कोंडी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. सरकारसह महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी त्यांनी सुशांतसिंह प्रकरणानंतर अभिनेत्री कंगनाला पुढे केले. यातही ते तोंडघशी पडत आहेत,’ असा टोला ग्रामविकास मंत्री यांनी भाजपला लगावला. यानंतर तरी भाजपने सरकारला उचकवण्याचे प्रयत्न थांबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर सातत्याने भाजपकडून राज्य सरकारला लक्ष्य केले जात आहे. गेल्या आठवडाभरात कंगना राणावत प्रकरणावरून भाजपकडून शिवसेनेसह राज्य सरकारवर टीका सुरू आहे. याला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘राज्यातील सरकार भक्कम असताना त्याला उचकवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा वापर झाला. यानंतर कंगना राणावत आणि रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले जात आहे. कोणताही संबंध नसताना याप्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. सुशांतसिंहला न्याय मिळवून देण्याचे वक्तव्य करणारे बिहारच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचा वापर करीत आहेत. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याने आता तरी त्यांनी सरकारला उचकवण्याचे थांबवावे.’

भाजपमधील फडणवीस आणि खडसे यांच्यातील वादाबद्दल बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘भाजपमधील हा पक्षांतर्गत वाद आहे. पण, फडणवीस हे ड्रायक्लीनर आहेत, हे खडसेंचे वाक्य मला पटले. फडणवीसांनी विनाचौकशी अनेकांना क्लीनचिट दिली आहे. खडसेंवर मात्र अन्याय झाला. खडसेंबद्दल मला सहानुभूती आहे.’ मुंबईत निवृत्त सैन्य अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘घडलेल्या घटनेची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात देशाच्या सैनिकांबद्दल नितांत आदर आहे. यामुळेच राज्य सरकारने माजी सैनिकांसाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.’

‘गुन्ह्यांची श्वेतपत्रिका काढा’

कायदा सुव्यवस्थेवरून सरकारवर टीका होत असल्याने मंत्री मुश्रीफ यांनी गेल्या सहा वर्षातील गुन्ह्यांची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात गंभीर गुन्हे घडले आहेत. अनेकदा कायदा सुव्यवस्था ढासळली. त्या तुलनेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात कायदा सुव्यवस्था भक्कम असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला आहे.

खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन प्लांट सुरू करावेत!

राज्यात ऑक्सिजनची टंचाई निर्माण होत असल्याने ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कारखान्यांशी चर्चा करून त्याचे उत्पादन वाढवले जात आहे. खासगी रुग्णालयांनी स्वतःचे ऑक्सिजन प्लांट सुरू करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. ऑक्सिजनची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन खात्याशी चर्चा केल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here