मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भाजप अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा झाली. यावेळी शहा यांनी , कलम ३७० रद्द करणे, एनआरसी आदी मुद्द्यांवरून विरोधकांना लक्ष्य केलं. जेएनयूमधील आंदोलनावरही शहा यांनी भाष्य केलं. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकायला हवं की नको, अशी विचारणा त्यांनी सभेला उपस्थित असणाऱ्या जनतेला केली. त्यानंतर राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत, असंही शहा म्हणाले.
यावेळी नागरिकत्व कायद्यावरून शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. कितीही विरोध करा, पण आम्ही सर्वांना नागरिकत्व देणार आहोत. भारतावर जितका अधिकार माझा आणि तुमचा आहे, तितकाच अधिकार पाकिस्तानमधून आलेल्या शरणार्थींचा आहे, असं शहा म्हणाले. आज काँग्रेस नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान देतो की, त्यांनी या कायद्यात नागरिकत्व हिरावून घेणारी एखादी तरतूद तरी आहे का, हे शोधून दाखवावं. हा कायदा नागरिकत्व देणारा आहे, नागरिकत्व हिरावून घेणारा नाही, असं शहा म्हणाले. व्होटबँकेच्या राजकारणामुळं हे सर्व विरोधक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times