मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर स्वत: गृहमंत्री यांनी मीडियाशी संवाद साधत ही माहिती दिली. राज्यात पोलीस दलातील साडेबारा हजार पदे भरण्यात येणार आहेत. पोलीस शिपाई संवर्गातील १०० टक्के पदे भरण्यात येणार आहेत, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या भरतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण-तरुणींना पोलीस दलात संधी मिळेल, असं सांगतानाच महाराष्ट्राच्या इतिहासातील पोलीस दलातील ही सर्वात मोठी भरती असल्याचा दावाही त्यांनी केला.
लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला होता. शिवाय अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली होती. त्यात काही पोलिसांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे पोलिसांवरील हा ताण कमी करण्यासाठी पोलीस दलात नवी भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.
या पूर्वी जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस दलात दहा हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी गृहविभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव आला होता. त्यात उपमुख्यमंत्र्यांनी आणखी दोन हजार जागा वाढवल्या होत्या. आज झालेल्या मंत्रिंडळाच्या बैठकीत आणखी अडीच हजार जागांची भर घालून साडेबारा हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times