काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील १२ हजार ५२८ जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री यांनी ही माहिती मीडियाला दिली. मात्र, त्यानंतर या भरतीवरून गदारोळ उठला. राज्यातील सर्वच मराठा नेत्यांनी या भरतीला आक्षेप घेतला. मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना ही भरती करून सरकार मराठा तरुणांवर अन्याय करत असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर देशमुख यांनी एक व्हिडिओ ट्विट करून सारवासारव केली आहे. मराठा समजााच्या १३ टक्के जागा वगळून ही पोलीस भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी कायदेशीर बाब तपासून मराठा समाजाला न्याय देण्यात येणार आहे, असं सांगतानाच टिकवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.
दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. हे केवळ मराठा समाजासाठी १३ टक्के जागा ठेवण्यासाठी हे काय देशमुख-पाटलांचं सरकार आहे का? ही लोकशाही असून सरकारचा हा निर्णय सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती असताना १६०० जागा वगळून भरती करणे ही सरकारची कृतीच असंविधानिक असून त्याविरोधात कोर्टात दाद मागण्यात येईल, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते देशमुख?
देशमुख यांनी काल मीडियाशी संवाद साधताना राज्यात पोलीस दलातील साडेबारा हजार पदे भरण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. पोलीस शिपाई संवर्गातील १०० टक्के पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या भरतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण-तरुणींना पोलीस दलात संधी मिळेल, असं सांगतानाच महाराष्ट्राच्या इतिहासातील पोलीस दलातील ही सर्वात मोठी भरती असल्याचा दावाही त्यांनी केला होता. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला होता. शिवाय अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली होती. त्यात काही पोलिसांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे पोलिसांवरील हा ताण कमी करण्यासाठी पोलीस दलात नवी भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times