दानवे यांनी गुरुवारी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. ‘साखर कारखान्यांच्या अडचणी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर पवारांसोबत चर्चा झाली. दोघांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे,’ अशी माहिती त्यांनी ट्वीट करून दिली. शरद पवार हे माजी कृषिमंत्री व देशातील एक महत्त्वाचे नेते आहेत. विविध प्रश्नांच्या संदर्भात सत्ताधारी नेते त्यांना भेटत असतात. तशीच दानवे आणि त्यांची भेट होती. मात्र, आज सकाळी दानवे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. त्यामुळं साहजिकच चर्चेला उधाण आलं आहे.
शरद पवार आणि संजय राऊत हे राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार मानले जातात. त्यामुळं दानवेंच्या या लागोपाठच्या भेटीचे अनेक अर्थ काढले जाऊ लागले. दानवे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना या भेटींबद्दल खुलासा केला. ‘साखर कारखान्यांची समस्या निर्माण झाल्यानंतर अनेकदा पवारांनी मला चर्चेसाठी बोलावलं आहे. या महिन्यात मला त्यांचे तीन वेळा फोन आले. साखरेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठीच मी त्यांच्याकडं गेलो होतो, असं दानवे म्हणाले.
संजय राऊतांशी झालेल्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘दिल्लीत आमची घरं अगदी जवळ आहेत. दारात उभे राहिलो तरी आम्ही एकमेकांना दिसतो. अशा वेळी सहज चहा घ्यायला म्हणून कोणीही बोलवत असतं. राऊतांशी झालेली भेट तशीच होती. यात करोनाच्या समस्येवर चर्चा झाली. त्या पलीकडं कुठलीही चर्चा झाली नाही.’
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times