आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ट्विट करून हा हल्ला केला आहे. केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पूरक एलईडी दिवे मुंबईत लावले गेले. तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्वीन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला. पण आता क्विन नेकलेसची माळ सत्ताधारी तोडूनच टाकत आहेत, क्वीन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय?, असा सवाल शेलार यांनी केला. आता पारसी गेट तोडला. समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार. परिसराची शोभा घालवणार. आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरण पूरक दिवे लावले ते पाप होते काय?, असा सवाल करतानाच झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड? मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या “ढोंगीपणाचा गाळ” दिसला ना अशा शब्दांत त्यांनी हल्ला चढवला आहे.
दरम्यान, कोस्टल रोडसाठी परिसरात येणारा पारसी गेट दुसरीकडे शिफ्ट करण्यात येत आहे. पारसी समाजाला जल पूजा करता यावी, यासाठी हा गेट बांधण्यात आला होता. या गेट खालून भुयारी मार्ग जाणार आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने त्यावरून राज्यातील सरकारवर नाव न घेता टीका केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times