मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सुट्टी जाहीर केली आहे. मंगळवार सायंकाळपासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले आहेत, तर रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मुंबईत पुढच्या २४ तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे महापालिका आयुक्तांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर केली. या काळात सर्व आस्थापना आणि कार्यालये बंद ठेवण्यात येतील.

मुंबईतील मुसळधार पाऊस पाहता काल रात्री ९ वाजल्यापासून महापालिका काम करत आहे. सध्या २५४ पाणी उपसा पंप चालू आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कुणीही रस्त्यावर येऊ नये. पाणी तुंबलेल्या ठिकाणी जाऊन मी स्वतः आढावा घेत आहे, अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली.

मुंबईतील वाहतूक सेवा विस्कळीत
सतत कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्ते तुंबले आहेत. त्यामुळे हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन आणि वांद्रे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर झाला आहे. रेल्वे ट्रॅकवरही पाणी असल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सायन-कुर्ला, चुनाभट्टी-कुर्ला आणि मस्जिद या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते वाशी रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. ठाणे ते कल्याण आणि वाशी ते पनवेल शटल सेवा सुरू असल्याचंही मध्य रेल्वेने सांगितलं.

बेस्ट बसचीही वाहतूक वळवली
रस्त्यावर पाणी साचल्यामुळे बेस्टची वाहतूकही वळवण्यात आल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. खालील मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली आहे.

-उड्डाणपुलामार्गे हिंदमाता व भोईवाडा मार्गे शिवडी
-भाऊ दाजी रोडमार्गे गांधी मार्केट
-सायन मेन रोडमार्गे सायन रोड २४
-मर्निया मस्जिद मार्गे मालाड सबवे (पूर्व व पश्चिम)

– लिंकिंग रोडमार्गे वांद्रे टॉकीज, जुना खार
– भगत सिंह नगरमार्गे शास्त्री नगर, गोरेगाव
-जेव्हीपीडी लिंकिंग रोडमार्गे अंधेरी मार्केट सबवे

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here