ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन हे तिन्ही मंत्री पुन्हा कामाला लागले आहेत. तर, एकनाथ शिंदे यांनाही करोनाची लक्षणं जाणवल्यानंतर करोनाची चाचणी केली त्यानंतर एका दिवसात या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती ठिक असून गेल्या काही दिवसांत त्यांच्या सपंर्कात आलेल्या व्यक्तींनी करोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष घटनास्थळी हजर होते. इमारत कोसळ्याचे वृत्त कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. भिवंडी महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींची ही त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली होती. दरम्यान, मंगळवारी झालेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील चर्चेतही एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. त्यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा ते मतदारसंघातही फिरत होते. तसंच, सततच्या संपर्कामुळं त्यांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात करोना रुग्णाचा आकडा काही कमी होताना दिसत नाहीये. राज्यात करोना रुग्णांचा वाढता आकडा चिंतेचा विषय ठरतोय. बुधवारी राज्यात २१ हजार २९ नवीन रुग्णांची नोंद झाली तर, ४७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या २ लाख ७३ हजार ४७७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times