अहमदनगर: राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असले तरी स्थानिक पातळीवर या पक्षांचे आपापल्या सोयीचे राजकारण सुरूच असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आजच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पूर्वी महापौरपदासाठी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देत सर्वाधिक जागा मिळविलेल्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले होते. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी सुरू असलेल्या या नवीन खेळीची चर्चा असून पारनेर नगरपंचायतीप्रमाणे याचेही वरिष्ठ पातळीवर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

वाचा:

महापालिकेच्या स्थायी समितीची उद्या निवडणूक आहे. त्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नगरसेवक मनोज कोतकर यांना उमेदवारी दिली. तर शिवसेनेने योगीराज गाडे यांना रिंगणात उतरविले आहे. सभापतिपदासाठी भाजपचे मनोज कोतकर इच्छुक होते. मात्र, स्थायी समितीमधील १६ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादीचे ५, शिवसेनेचे ५, भाजपचे ४, काँग्रेस व बसपा यांचा प्रत्येकी एका नगरसेवकांचा समावेश आहे. राज्यातील सत्तेचे समिकरण पाहता राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीचे एकूण ११ सदस्य स्थायी समितीमध्ये आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक कोतकर यांना ही निवडणूक सोपी नव्हती. त्यातच त्यांनी आज अचानक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, व स्थायीच्या सभापतीपदासाठी अर्ज भरला. विशेष म्हणजे या अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून राष्ट्रवादीचेच नगरसेवक गणेश भोसले व कुमार वाकळे हे आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनीही स्थायी समितीच्या सभापती पदासाठी अर्ज भरला आहे. गाडे यांना विजय पठारे सूचक तर शाम नळकांडे अनुमोदक आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यामुळे आता ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले कोतकर व शिवसेनेचे गाडे यांच्यामध्ये स्थायी समितीची सभापती पदाची निवड होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेचे समीकरण पाहता, ऐनवेळी दोघांपैकी कोणत्या पक्षाचा उमेदवार माघार घेणार आणि लढत झाली तर कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.

वाचा:

दरम्यान, याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘आज झालेल्या राजकीय घडामोंडीबद्दल वरिष्ठ स्तरावर माहिती दिली आहे. तेथून ज्या पद्धतीने आदेश येईल, तसा निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात येईल.’ तर, भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, ‘आमच्या पक्षातील नगरसेवकाने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मात्र, त्याबाबत काय भूमिका घ्यायची, हे लवकरच आम्ही बैठक घेऊन ठरवणार आहोत.’

भाजपला धक्का की नवीन खेळी?

नगरसेवक मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, हा भाजपला धक्का आहे की भाजपने स्थानिक स्तरावर केलेली नवीन खेळी आहे, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजपने यापूर्वीही नगरच्या महापालिकेत संख्याबळ कमी असतानाही राष्ट्रवादीच्या पाठिंबाच्या बळावर महापौर व उपमहापौर पद मिळवले आहे. आता १६ सदस्य असणाऱ्या स्थायी समितीमध्येही भाजपचे अवघे ४ सदस्य असून राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीतील पक्षाचे ११ सदस्य आहेत. हे संख्याबळ पाहता भाजपच्या उमेदवाराला ही निवडणूक अवघड असल्याचे मानले जात होते. त्यामुळे ऐनवेळी सभापतीपदासाठी इच्छुक असणाऱ्या कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून ही भाजप व राष्टवादी दोघांची मिळून नवीन खेळी असल्याचेही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार कोतकर पूर्वी काँग्रेसमध्ये होते. महापालिका निवडणुकीत त्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीला जर त्यांचा सभापती करायचा होता, तर त्यांच्याकडे असलेल्या अन्य उमेदवारांना उमेदवारी देण्याऐवजी भाजपमधून आयात केलेल्या उमेदवाराला का दिली? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादीने भाजपचा पाठिंबा काढून घेऊन शिवसेनेसोबत यावे, अशी चर्चा आणि मागणीही सुरू झाली होती. मात्र, हा केवळ बाहेरून पाठिंबा असल्याचे सांगत याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे यावेळी ही वेगळी राजकीय खेळी खेळली जात असल्याची चर्चा आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here