शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप यांच्यात टोकाचे राजकीय वैर होते. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेच्या जादा जागा असूनही राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देत भाजपचा महापौर केला होता. या दोघांतील वैर संपता संपत नव्हते. अलीकडेच राठोड यांचे निधन झाले. त्यानंतर मंत्री गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नगरची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. त्याची पहिली झलक आता मनपा स्थायी समितीच्या निवडणुकीत पहायला मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपचा उमेदवार फोडून त्याला उमेदवारी दिली. तर शिवसेनेनेही आपला उमेदवार उभा करून पारंपरिक लढत देण्याची तयारी सुरू केली.
वाचा:
यामध्ये मंत्री गडाख यांनी लक्ष घातले. स्थानिक शिनसेना नेत्यांशी संपर्क ठेवून वरिष्ठ पातळीवरही चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्या नंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याचे ठरले. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी सकारात्नक प्रतिसाद दिला. त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे मनोज कोतकर स्थायी समितीचे बिनविरोध सभापती झाले. शिवाय राष्ट्रवादीला भाजपची मदत घेण्याची गरज पडली नाही.
वाचा:
आता महापालिकेते राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येण्याचेही ठरविण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला दिलेला पाठिंबाही यापुढे काढला जाण्याची शक्यता असून पुढील महापौर निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन भाजपला दूर ठेवण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनी यावर प्रति क्रिया देताना शिवेनेने शब्द पाळल्याचे म्हटले आहे. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्वांचे आभार मानले आहेत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. यापुढेही दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांचा निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर मान्य करू, असेही जगाताप यांनी म्हटले आहे.
वाचा:
ही समेट घडवून आणण्यासाठी शिवसेनेकडून स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री शंकरराव गडाख, सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप यांची भूमिका महत्वाची ठरली. या दोन्ही पक्षांत नगर शहरात केवळ राजकीय वैर नव्हते तर थेट खुन्नसच होती. त्याचा शहराचे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक वातावरणावरही परिणाम होत होता. आता हा वाद मिटल्याने कार्यकर्त्यांचेही मनोमिलन झाले तर वातावरण बदलण्यास मदत होणार आहे. गाडे आणि जगताप एकमेकांचे सोयरे आहेत. तरीही राजकारणात त्यांची खुन्नस होतीच. ती कमी करण्यात गडाख यांना यश आल्याचे मानले जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times