मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत सोनवले हे मूळचे सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील आहेत. ते उचगाव येथे भाड्याने राहात होते. गवंडी व पेंटर अशी किरकोळ कामे ते करत होते. त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर हा २२ वर्षांचा असून तो बेरोजगार आहे. यामुळे वडील त्याला सतत कामाला जा म्हणून आग्रह धरत होते. यातूनही दोघांत नेहमी वाद होत होते. दुपारी वडील आणि मुलगा जेवत असताना भाजीवरून दोघात वाद झाला. वडिलांनी त्याला तांब्या फेकून मारला. याशिवाय त्याच्या दोन कानशिलात लगावले. यातून दोघांत वाद वाढला. वडिलांनी मारहाण केल्याचा राग आल्याने मुलाने वडिलांच्या छातीत कात्री खुपसली. कात्रीचे घाव वर्मी लागल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला.
चंद्रकांत सोनवले यांच्या हत्येनंतर मुलाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली. पण अज्ञात व्यक्तीने पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. घटना घडली त्यावेळी आजी घरात होती. दुसरे कुणी घरात नसल्याने गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी मुलगा ज्ञानेश्वर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी करवीर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा अधिक तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर करत आहेत.
भिवंडीत मुलाकडून वृद्ध वडिलांची हत्या
भिवंडीतही मुलाने जन्मदात्या पित्याची हत्या केली. ब्रिजेश पाटील असे आरोपीचे नाव असून, गुरुनाथ पाटील ( वय ६५) असे मृत वडिलांचे नाव आहे. ब्रिजेशने त्यांच्यावर सुऱ्याने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या गुरुनाथ यांना तातडीने भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भिवंडीतील कामतघर येथे हा प्रकार घडला असून ब्रिजेशला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times