मुंबईः राज्यात गेले काही दिवस दररोज २० हजारांवर नवीन करोनाबाधितांची भर पडत असताना आज हा आकडा कमी झाला आहे. आज ११ हजार ९२१ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, करोनामृतांचा आकडाही कमी झाला असून, ही दिलासादायक बाब आहे.

राज्यात करोनाची आकडेवारी चिंता वाढवणारी असली तरी करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. राज्यात आज एकाच दिवशी १९ हजार ९३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १० लाख ४९ हजार ९४७ इतकी झाली आहे. त्याचबरोबर राज्याचा रिकव्हरी रेटही वाढताना दिसत आहे. आज राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७. ७१ इतके झाले आहे.

तर, राज्यात सातत्याने करोनाचे रुग्ण वाढत आहेत. आज दिवसभरात ११ हजार ९२१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १३ लाख ५१ हजार १५३ इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६६ लाख २२ हजार ३८४ चाचण्यांपैकी १३ लाख ५१ हजार १५३ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज दिवसभरात १८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोनामृतांचा आकडा ३५ हजार ७५१ इतका झाला आहे. राज्यात सध्या २ लाख ६५ हजार ०३३ इतके अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील मृत्यूदर २. ६५ टक्के इतका आहे. राज्यात सध्या १९ लाख ७५ हजार ९२३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, २९ हजार९२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here