नवी दिल्ली : मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीकडे (एनएमपी) ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये महिना प्रति महिना आधारावर एमएनपीमध्ये २४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. मोबाइल नंबर कायम ठेवत दूरसंचार कंपनी बदलण्यात ग्राहकांचा रस कमी होत असल्याचं ही आकडेवारी सांगते. कदाचित त्यामुळेच आयडिया-व्होडाफोन, एअरटेल आणि रिलायन्स जिओ या तीनही कंपन्यांचे दर आणि नेटवर्क गुणवत्ता जवळपास सारखीच झाली आहे.

दूरसंचार क्षेत्रातील जाणकारांच्या मते, ‘एमएनपी कमी होणं ही दूरसंचार कंपन्यांसाठी आनंदाची बाब आहे. याचाच अर्थ, कंपन्यांना आपले सध्याचे ग्राहक सोडून जाऊ नये यासाठी जास्त गुंतवणूक करावी लागणार नाही.’ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ‘ट्राय’च्या आकडेवारीवर आधारित आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, ऑक्टोबर २०१९ मध्ये ४१ लाख ग्राहकांनी मोबाइल नंबर पोर्ट केला. हाच आकडा सप्टेंबरमध्ये ५४ लाख होता. याशिवाय एमएनपी चर्न रेट (नंबर पोर्ट करावा की नाही हा विचार करणे) ०.३ टक्क्यांनी घसरला, जो सप्टेंबर २०१९ मध्ये ०.५ टक्के होता.

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांच्या मते, पोर्टेबिलिटीचं मुख्य कारण हे स्वस्त प्लॅन आहे. अगोदर तुम्ही विविध स्वस्त किंमतीचा फायदा घेऊ शकत होता. पण आता सर्वच कंपन्यांच्या किंमती एकसारख्या झाल्या आहेत, ज्यामुळे नंबर पोर्ट करण्यासाठी कारण उरलेलं नाही.’

दूरसंचार कंपन्यांनी तीन वर्षांच्या टेरिफ वॉरनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दर वाढवले आहेत. याला जिओही अपवाद नाही. काही दूरसंचार कंपन्यांनी ३३ टक्क्यांपर्यंत दरवाढ केली आहे. जाणकारांच्या मते, पोर्टेबिलिटीमागे दर हे एकमेव कारण नाही. नवीन ग्राहक जोडण्यापेक्षा जुन्या ग्राहकाला टिकवून ठेवणं जास्त महागडं आहे, असंही मॅथ्यूज सांगतात. नवीन ग्राहक जोडताना कंपन्यांना पडताळणी प्रक्रिया शुल्क मिळतं. पण जुन्या ग्राहकाला टिकवून ठेवताना कंपन्यांना जास्त कसरत करावी लागते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here