आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सामना खेळला जात आहे. क्रिकेट सामना पाहायला पोहोचलेल्या या क्रिकेट प्रेमींनी नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात स्टेडियममध्ये आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. गेल्या काही दिवसापासून विद्यार्थ्यांनी या विरोधात आंदोलन पुकारले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही वानखेडे स्टेडियममध्ये आंदोलन केल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. चर्चा करण्यासाठी मोदी मोठ्या व्यक्तींना बोलावतात तर मग विद्यार्थ्यांना ते का बोलावत नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीपासून आतापर्यंत अनेक घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे. परंतु, त्यांनी काम केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ चे पंतप्रधान राहिले नाहीत. आता खरं म्हणजे त्यांनी काम करण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी बोलावून विद्यार्थ्यांशी संवाद साधायला हवा. त्यावेळी आम्ही त्यांना या कायद्याविषयी सांगू. या एका कायद्यामुळे देश कमकुवत होत आहे. देशातील अनेक भागात नागरिकत्व संशोधन कायदा व एनआरसी विरोधात आंदोलन होत आहे. गेल्या काही दिवसापासून काही विद्यापीठात तसेच कॉलेजमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीसह अनेक भागात झालेल्या हिसांचारात अनेकांचा मृत्यू झाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times