बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्यानं संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. बाबरी मशीद पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली, असं निरीक्षण नोंदवलं आहे. त्याचबरोबर आरोपींविरोधात ठोस पुरावा नसल्यानं आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत स्वागत केलं आहे.
‘लालकृष्ण अडवाणी, उमा भारती यांची निर्दोष सुटका झाली आहे. न्यायालयानंही म्हटलं आहे हा कोणताही पूर्वनियोजित कट नव्हता. निकालानंतर आता या गोष्टी विसरायला हव्यात. आता अयोध्येत राम मंदिर निर्माण होत आहे. बाबरीचा ढाचा पाडला नसता तर अयोध्येत राम मंदिर बनलं नसतं. शिवसेनेकडून लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांचं अभिनंदन. आम्हालाही हाच निर्णय अपेक्षित होता,’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान, ज्या दिवशी पंतप्रधान मोदींनी अयोध्येत जाऊन भूमीपूजन केलं तेव्हाच बाबरीचा खटला संपला आहे. आता न्यायालयाला आणि खटल्याला काहीच महत्त्व राहत नाही. बाबरी पाडली म्हणून राम मंदिर उभं राहिलं, असं ही ते म्हणाले. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे मत मांडलं आहे.
१९९२मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी मशीद अपघातानं पाडली, असा महत्त्वाचा निर्णय कोर्टानं दिला आहे. तसंच, या प्रकरणी सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाबरी प्रकरणी तक्रारदारांकडून दाखल करण्यात आलेले फोटो, व्हिडिओ पुरावे म्हणून कोर्टाने मान्य केले नाही. फोटो किंवा व्हिडिओद्वारे कोणीही दोषी सिद्ध होत नाही, असे भाष्य कोर्टाने या प्रकरणात केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times