मिरा- भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या डिजीटल उद्धाटन सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधताना उत्तर प्रदेशमध्ये घडलेले घटनांवर भाष्य केलं आहे. तसंच, महाराष्ट्रात हे सहन केलं जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
‘उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्रात हे सहन होणार नाही, माझ्या माता-भगिनींकडे अत्याचार करण्याचं तर सोडाचं पण वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत होता कामा नये,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मला नेहमी दरारा आणि दहशत या बद्दल सांगायचे. पोलिसांचा असतो तो दरारा आणि गुंडाची असते ती दहशत, ही दहशत मोडून काढा. जर, गुंडागर्दी चालू असेल तर ही दहशत मोडून काढली पाहिजे, त्या गुंडांसाठी पोलिसांचा दरारा पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.
यूपीत काय घडलं?
१९ वर्षांच्या पीडित दलित मुलीवर १४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चार हैवानांनी क्रूरपणे अत्याचार केले होते. आपलं कृत्य लपवण्यासाठी आणि मुलीनं काही बोलू नये यासाठी त्यांनी सामूहिक बलात्कारानंतर जीभ कापली होती, तसंच पाठीचा कणाही मोडला होता. ग्णालयात दाखल केल्यानंतर ही मुलगी तब्बल नऊ दिवस बेशुद्धावस्थेतच होती. गेले १५ दिवस ती मृत्यूशी झुंजच देत होती अखेर तिची ही लढाई अर्धवट राहिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times