जून महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा कहर सुरू झाला. जुलै महिन्यात त्याचा संसर्ग वाढत गेल्याने बाधितांचा आकडा वीस हजारावर गेला. त्यामुळे अनेकांना उपचारासाठी खाटा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळणे अवघड झाले. याचाच गैरफायदा घेत काही खाजगी रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईकांची अक्षरशः लूट सुरू केली. दीड ते दोन लाख भरून घेतल्यानंतरच रुग्णांवर उपचार सुरू झाले. अनेक औषधांचा वापर करत अव्वाच्या सव्वा दर लावल्याने काही रुग्णांनी करोनापेक्षा बिलाच्या भीतीनेच जगाचा निरोप घेतला. पैशाअभावीअनेक नातेवाईकांची अक्षरश: फरफट सुरू झाली.
ही लूट थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक लेखापरीक्षकांची नियुक्ती केली. प्रत्येक रुग्णालयाकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक बिलाची तपासणी या लेखापरीक्षकाकडून केली जाते. बिल जास्त वाटल्यास अथवा नातेवाईकांनी तक्रार केल्यास त्याची पडताळणी करून मग बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पडताळणी विना रुग्णालयांनी बिल भरून घेतल्यास कारवाई केली जाते. कोल्हापुरातील एका रुग्णालयावर या पद्धतीने कारवाई झाली.
कोल्हापूर शहरात ५० रुग्णालये असून त्यावर देखरेख ठेवण्यासाठी २३ लेखापरीक्षक आहेत. जिल्ह्यात ६८० रुग्णालय असले तरी पन्नासपेक्षा अधिक बेड असलेले साठ रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाचे २१ लेखापरीक्षक तसेच सर्व तहसीलदारांनी नेमलेले इतर काही लेखापरीक्षक आहेत. त्यांच्याकडून लेखापरीक्षण करून घेतल्यानंतरच नातेवाइकांकडून बिल भरून घेतले जाते. एक ऑगस्ट पासून या समितीचे कामकाज सुरू झाले आहे. दोन महिन्यात समितीने तब्बल दीड कोटी रुपये ज्यादा आकारलेले बिल रुग्णांना परत देण्यास भाग पाडले. यामध्ये शहरातील सव्वा कोटी तर ग्रामीण भागातील २५ लाखाचा समावेश आहे.
काही ठिकाणी नातेवाईक तक्रार करत नाहीत, आपल्या रुग्णाकडे दुर्लक्ष होईल या भीतीपोटी डॉक्टर सांगतील तेवढे बिल नातेवाईक भरतात. त्यामुळे दीड कोटीची लूट समितीने थांबवली असली तरी प्रत्यक्ष लुटीचा आकडा अनेक कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. किमान लेखापरीक्षणकाकडून बिलाची पडताळणी होते याची भीती असल्याने रुग्णालयाकडून काही प्रमाणात का होईना लूट थांबली आहे. शिवाय प्रशासनाकडे तक्रारी येत नसल्यामुळे या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणे काही प्रमाणात अडचणीचे ठरत आहे.
रुग्णालयाकडून रुग्णांची लूट होऊ नये यासाठी शहर व जिल्ह्यात समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीकडून लेखापरीक्षण सुरू आहे. तरीही काही तक्रारी आल्यास अशा डॉक्टरवर कडक कारवाई करण्यात येईल.
– सतेज पाटील, पालकमंत्री
कोल्हापूर शहरात पहिल्या टप्प्यात काही रुग्णालयाकडून लूट सुरू होती, पण लेखापरीक्षक नेमल्यानंतर या वृत्तीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध आणण्यात महापालिकेला यश आले आहे. तरीही कोणाची तक्रार असल्यास त्यांनी तातडीने संपर्क साधावा.
– डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आयुक्त महापालिका
शहरातील लेखापरीक्षक
२३
जिल्ह्यातील लेखापरीक्षक
२१
शहरातील दवाखाने
५०
जिल्ह्यातील दवाखाने
६८०
जिल्ह्यातील मोठे दवाखाने
५०
शहरातील दवाखान्यांकडून लुट
१ कोटी २५ लाख
जिल्ह्यातील दवाखान्यांकडून लुट
२५ लाख
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times