या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून, राजकीय वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक चौकशीनंतर स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. दीपक मारटकर हे रात्री जेवण झाल्यानंतर घराबाहेर पडले होते. मध्यरात्री साधारण एकच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले. यात जखमी झालेल्या मारटकर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तासाभरानंतर त्यांचा मृत्यू झाला. फरासखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांची भेट घेतली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क, दुचाकीवर नंबर प्लेटही नव्हती
मारटकर जेवण झाल्यानंतर घराबाहेर पडले होते. पाच ते सहा जण दबा धरून बसले होते. मारटकर येताच त्यांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार केले. मारटकर यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ते धावत सुटले. मात्र, हल्लेखोरांनी त्यांना पकडले आणि पुन्हा त्यांच्यावर वार केले. हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क होते. तर ते ज्या दुचाकीवरून आले होते, त्या दुचाकींना नंबर प्लेटही नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या मारटकर यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. फरासखाना पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. राजकीय वादातून ही हत्या झाल्याचा संशय होता. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times