हाथरस प्रकरणावरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणी देशभरातून होत आहे. हीच मागणी करत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी हाथरसला निघाल्या होत्या. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अडवलं व त्यांच्याशी गैरवर्तन केलं. त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या व सध्या भाजपच्या महिला उपाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. ‘एका महिला नेत्याच्या कपड्यांना हात लावायची हिंमतच पोलिसांनी कशी केली? ही बाब केवळ राजकारणातील महिला नेत्यापुरती मर्यादित नाही. कुठलीही महिला असेल, पोलिसांनी अशा पद्धतीने आपली मर्यादा ओलांडता कामा नये,’ असं वाघ यांनी ट्वीटमधून ठणकावलं आहे.
वाचा:
‘हा पक्षाच्या पलीकडचा विषय आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भारतीय संस्कृतीचा मान राखणारे आहेत. संस्कृतीचं रक्षण करणारे आहेत. त्यांनी या पोलिसांवर ताबडतोब कारवाई करायला हवी,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे. ‘करोनामध्ये पोलिसांनी करोना योद्धे म्हणून चांगलं काम केलं, पण अधूनमधून अशा घटना घडतात. हे सगळं चुकीचं आहे. हे देशात कुठेही होता कामा नये, अशी भावनाही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली.
वाघ यांच्या या भूमिकेचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे. ‘एक महिला नेत्या म्हणून पक्षीय जोडे बाजूला ठेवून चित्राताईंनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. पक्ष बदलला असला तरीही तुमचे संस्कार व विचार विसरला नाहीत ह्याचा अभिमान आहे,’ असं ट्वीट महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांनी केलं आहे. ‘मात्र, आपलं बोलणं योगीनाथ ऐकतील का? हा प्रश्न आहेच,’ असा टोलाही त्यांनी हाणला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times