नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB)अहवालात दोन हजारांच्या नकली नोटांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा रोखण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने नवीन ५०० आणि २००० रुपयांची नोट बाजारात आणली. २००० रुपयांची नोट अधिक सुरक्षित असल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता, मात्र हा दावा सपशेल फोल ठरला आहे. मागील तीन वर्षात देशभरात जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांपैकी दोन हजारांच्या सर्वाधिक नोटा आढळून आल्या आहेत. २०१७ आणि २०१८ या वर्षात जप्त केलेल्या एकूण बनावट नोटांपैकी ५६.३१ टक्के बनावट नोटा २००० रुपयांच्या आहेत. याचे मूल्य ४६.०६ कोटी आहे.
नोटाबंदीनंतर २०१६ मध्ये २००० रुपयांची नोट चलनात आली. मात्र त्यानंतर देशभरातून २००० रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहेत. गुजरातमधील जप्त नोटांचे प्रमाण २६.२८ टक्के आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडु, उत्तर प्रदेश या राज्यांमधून अनुक्रमे ३.५ कोटी, २.८ कोटी आणि २.६ कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याचे म्हटलं आहे.
नोटाबंदीनंतर ५३ दिवसांत २२७२ नोटा जप्त २००० रुपयांची नोट अधिक सुरक्षित असल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. मात्र नोटाबंदीनंतर ५३ दिवसांत २००० रुपयांच्या २२७२ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. दोन हजाराच्या नोटेची नक्कल सहज शक्य होत असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात म्हटल आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times