आबुधाबी, : कोणत्याही संघाने आमचा नाद करायचा नाही, असाच संदेश मुंबई इंडियन्सने आजच्या विजयानंतर सर्व संघांना दिला आहे. मुंबईने या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत मात केली आणि मोठा विजय साकारला. मुंबईने राजस्थानपुढे विजयासाठी १९४ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान राजस्थानला पेलवेल नाही आणि मुंबईने ५७ धावांनी मोठा विजय साकारला.

मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला सुरुवातीलाच तीन धक्के बसले. यामध्ये यशस्वी जैस्वाल, स्टीव्हन स्मिथ आणि संजू सॅमसन यांचा समावेश होता. या तीन धक्क्यानंतर राजस्थानची ३ बाद १२ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर जोस बटलरने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. बटलरने यावेळी ४४ चेंडूंत ४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ७० धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पण बटलरला दुसऱ्या फलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही आणि राजस्थानचा पराभव झाला.

मुंबईच्या गोलंदाजांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमरा यांनी आपल्या पहिल्या स्पेलमध्ये राजस्थानला तीन धक्के दिले. पण त्यानंतरही मुंबईच्या गोलंदाजांनी ठराविक फरकाने विकेट्स मिळवल्या. त्यामुळेच मुंबईला राजस्थानवर मोठा विजय साकारता आला. बुमरा आणि बोल्ट यांनी राजस्थानचा अर्धा संघ गारद केला आणि त्यामुळेच मुंबईचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.

मुंबईचा सूर्यकुमार यादव आजच्या सामन्यात तळपल्याचे पाहायला मिळाले. सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबईला राजस्थानपुढे १९४ धावांचे आव्हान ठेवता आले. सूर्यकुमार यादवने यावेळी ४७ चेंडूंत ११ चौकार आणि दोन षटाकांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची खेळी साकारली. यादवला यावेळी अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पंड्याने चांगली साथ दिली. हार्दिकने यावेळी १९ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ३० धावा केल्या.

मुंबईने यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी यावेळी ४९ धावांची सलामी दिली. पण राजस्थानकडून पदार्पण करणाऱ्या कार्तिक त्यागीने यावेळी आपल्या पहिल्याच षटकात डीकॉकला बाद केले. त्यागी पाचवे षटक टाकत असताना तिसऱ्याच चेंडूवर रोहित शर्माने त्याला षटकार लगावला. पण त्यानंतरही त्यागी बिथरला नाही. पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने मुंबईचा सलामीवीर डीकॉकला बाद केले आणि आपल्या संघाला पहिले यशही मिळवून दिले. डीकॉकने यावेळी १५ चेंडूंत २३ धावा केल्या.

डीकॉक बाद झाल्यावर रोहित आणि सूर्यकुमार यादव यांची जोडी चांगली रंगली. रोहित यावेळी अर्धशतक झळकावत विक्रम रचेल, असे वाटत होते. पण श्रेयस गोपाळने रोहितला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. रोहितने २३ चेंडूंत ३५ धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर त्यानंतरच्याच चेंडूवर मुंबईचा इशान किशनही बाद झाला. त्यामुळे मुंबईला आता सलग दोन धक्के बसले होते. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कृणाल पंड्यालाही चांगली खेळी साकारता आली नाही. कृणालला १२ धावा करता आल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here