म. टा. प्रतिनिधी, जळगावः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विषयक तीन विधेयक मंजूर झाली. मात्र, या कृषी कायद्यांना विरोध ही राज्य शासनाला सुचलेली विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याची टीका चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान आज चाळीसगावात कृषी सुधारणा कायद्याला राज्य शासनाने दिलेल्या स्थगितीच्या अध्यादेशाची भाजपाकडून तहसीलदार कार्यायासमोर होळी करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे खासदार उन्मेष पाटील देखील होते.

आमदार मंगेश चव्हाण पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या कायद्याला आज विरोध करणारे महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा यांची जुनी भाषणे पाहावी त्यात त्यांनी याच मागण्या त्यावेळी केल्या होत्या तसेच राज्यातील सर्व शेतकरी संघटना यांच्या मागण्या याच होत्या की, शेतकरी बंधनमुक्त झाला पाहिजे, त्यांना त्यांचा माल कुठेही विकता आला पाहिजे. कृषी हा विषय राज्य व केंद्राच्या समवर्ती सूचित असल्याने राज्य शासन त्यांची मनमानी करू शकत नाही आणि केवळ राजकीय आकसापोटी जर शेतकऱ्यांवर बंधने आणायचे ते प्रयत्न करणार असतील तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारेल असा इशाराही आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला. यावेळी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात – बांधावर जाऊन कायद्याविषयी जनजागृती करावी असे आवाहन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी केले.

यावेळी खासदार उन्मेश पाटील, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजय पाटील, तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे चाळीसगाव तालुक्यातील विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here