मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ‘राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला एमपीएससीची परिक्षा घेण्याची एवढी घाई का? असा सवाल उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट करत उपस्थित केला आहे. तर, मराठा समाज जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. यांची जाणीव ठेवून सरकारने एमपीएससीच्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा सामाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नका,’ असा सूचक इशारा दिला आहे.
येता ११ तारखेला एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे. तरीही, सरकारने परीक्षा घेण्याची अन्यायकारक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाला कोर्टात स्थगिती दिल्यानंतर लगेच १५ हजार जागा भरण्याची सरकारला इतकी घाई का झाली आहे? आरक्षणाच्या स्थगितीमुळं मराठा समाजात मोठी चीड निर्माण झाली आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत आहे, अशी टीका उदयनराजे यांनी केली आहे.
उदयनराजे यांच्या फेसबुक पोस्टचे महत्त्वाचे मुद्दे
>> मराठा आरक्षणाचा योग्य न्याय देणारा निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारने परीक्षा घेण्याचा घातकी निर्णय करु नये.
>> सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्णयानंतर त्या परीक्षा नव्याने घेता येतील. तसंच, विद्यार्थ्यांची अशा परीक्षेसाठीची वयोमर्यादा वाढवून सर्वानांच संधी मिळेल अशी व्यवस्था करावी. वयोमर्यादा वाढल्यामुळं कोणाचीही संधी हुकणार नाही हे नक्की. त्यामुळं शासनाने आज तरी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घोषित करावा
>> करोना महामारीच्या परिस्थितीत कोचिंग क्लास ग्रंथालय आणि अभ्यासिका बंद असल्यामुळं विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य झाले नाही. तसंच, परीक्षेसाठी पोषक असे वातावरण नसताना सरकार या परीक्षा कशासाठी घेत आहेत?
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times