म.टा. प्रतिनिधी, नगरः ‘मंदिरे उघडण्यासाठी झालेल्या आंदोलनांतील भाविकांच्या भावानांचा नसेल तर किमान मंदिरांवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेचा विचार करून तरी राज्य सकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला पाहिजे. मात्र, ठाकरे सरकार मंदिरे खुली करण्यासंबंधी एवढा हट्टीपणा का करते, हेच कळत नाही,’ असा सवाल माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
प्रवरानगर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

राज्यातील प्रमुख धर्माचार्य, विविध संप्रदायांचे साधु-संत, अनेक धार्मिक व आध्यात्मिक संघटना यांच्यातर्फे १३ ऑक्टोबर रोजी मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. याला पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यासंबंधी विखे पाटील बोलत होते.
ते म्हणाले, ‘अर्थ व्यवस्था सावरण्यासाठी सरकारने अन्य व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मंदिरे उघडण्यासाठी अनेकदा मागण्या आणि आंदोलने होऊनही याची दखल घेतली जात नाही. या हट्टी सरकारला आता साईबाबांनीच सदबुध्दी द्यावी. मोठी मंदिरे असलेल्या गावातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. याचे गांभीर्य सरकारने लक्षात घेण्याची गरज आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले.

साखर उद्योगासाठी उपयुक्त निर्णय

साखर उद्योगासंबंधी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे विखे पाटील यांनी स्वागत केले. ते म्हणाले, ‘इथेनॉल उत्पादन आणि साखर विक्रीचे दर निश्चित करण्याचे केद्र सरकारने घेतलेले धोरण क्रांतिकारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादन वाढविण्यास तसेच याबाबत दीर्घ मुदतीचे करार करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यापूर्वी इथेनॉल उत्पादन होत असले तरी याबाबत होणारे करार हे मर्यादित असायचे. आता इथेनॉलच्या किंमती निश्चित करतानाच पाच वर्षांच्या दीर्घ मुदतीचे करार करण्यास परवानगी दिल्याने साखर कारखान्यांना दिलासा मिळणार आहे. साखरेचे विक्री मूल्य देखील निश्चित करण्यासाठी केद्र सरकारने टाकलेले पाऊल क्रांतिकारी आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here