म. टा. प्रतिनिधी,

शहरात बुधवारी रात्री धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या दहा वर्षातील सर्व विक्रम मोडले. रात्री नऊ ते अकरा या दोन तासात संपूर्ण शहरात धुवाँधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. कात्रज भागात काल रात्री अकरा वाजेपर्यंत तब्बल १५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर शिवाजीनगरला ९६ मिलीमीटर पाऊस पडला. कात्रज तलाव, टांगेवाला कॉलनीसह आणि अरणेश्वर परिसरातील नागरिकांना घरात पाणी शिरल्याने प्रशासनाला महापालिकेच्या शाळेत हलवावे लागले.

हवामान विभागाने दोन दिवसांपासूनच पुण्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हा अंदाज खरा ठरवत, काल संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढत गेला. रात्री नऊच्या दरम्यान ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट वाढला. रात्रीच्या निरव शांततेत आकाशात सुरु असलेल्या य जुगलंबंदीने लोकांना धडकी भरली. रात्री साडे नऊनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाला जोर प्रचंड असल्याने घरातून पलीकडील इमारत देखील दिसत नव्हती. रस्त्यावरुन जाणाऱया दुचाकी, चारचाकी चालकांना गाडी चालविणे अवघड झाले. बघता बघता मुख्यरस्ते, उपनगरातील गल्ली बोळांमध्ये पाणी साठायला सुरुवात झाली आणि पाण्याचे लोंढे वाट मिळेल तिथून वाहत होते.

वाचा:

पाण्याची पातळी वाढल्याने कात्रज तलाव पूर्ण क्षमतेने भरला, परिणामी आंबील ओढ्याची पातळीही वाढली. ओढ्या लगतच्या घरांमध्ये पाणी शिरले. गेल्या वर्षी २५ सप्टेंबरला आलेल्या पुराची आठवण कायम असल्याने या पावसाने लोकांच्या मनात धडकी भरली. सिंहगड रोडवरही दुभाजकांच्या उंचीचे पाण्याचे लोट वाहत होते, त्यामुळे विठ्ठलवाडीपासून धायरीकडे जाणारा पुढील रस्ता प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला होता. काही ठिकाणी लोकांनी दुभाजक तोडून पाण्याला वाट करुन दिली. वारजे येथील वाजंळे पुलाखालीही पाणी साठल्याने पुढे जाण्याचा मार्ग बंद झाला होता. कोथरुड, औंध, बाणेर भागातही रस्त्यांवरुन पाण्याचे लोंढे वाहत होते. रात्री बारानंतर पावसाचा जोर ओसरला पण रस्त्यावरील पाणी कायम होते. पावसामुळे रात्री अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. रात्री उशारापर्यंत शहराच्या विविध भागात पाण्यात अडकलेल्या लोकांसाठी मदत कार्य सुरु होते.

शहरात बुधवारी रात्री पडलेल्या पावसाचे आकडे (रात्री अकरा पर्यंत)

शिवाजीनगर ९६ मिमी.

कात्रज १५१ मिमी

खडकवासला १२१

वारजे ८७

कोथरूड ८१.२

(स्रोत – पुणे वेधशाळा, आशय मेझरमेंट केंद्र)

आजचा दिवसही पावसाचा

बंगालच्या उपसागरातून आंध्र प्रदेशामध्ये जमिनीवर आलेले अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी संध्याकाळी मध्य महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. हे कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी महाराष्ट्रावरच राहणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात गुरुवारीही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यामध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here