वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनीच बंदच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र बंद पुकारण्यात येत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले. या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
बंदला ३५ संघटनांचा पाठिंबा
सीएए आणि एनआरसी विरोधात मुंबई व महाराष्ट्रात ज्या ज्या संघटनांनी आंदोलन केले आहे त्या सर्वच संघटनांना वंचित बहुजन आघाडीने आजच्या बैठकीसाठी आमंत्रित केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास ३५ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. बैठकीत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. सीएए व एनआरसीसोबतच देशाच्या आर्थिक स्थितीवरही आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत सर्वांचेच होते. त्यानुसार या सर्व मुद्द्यांवर मुंबईसकट महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला लोकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा द्यावा, असे आमचे आवाहन असून या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times