म. टा. प्रतिनिधी, पुणेः अतिवृष्टीमुळे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे ताबडतोब सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिले आहेत. शहरामध्ये पंचनामे करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकांमध्ये दोन महसूल विभागाचे अधिकारी आणि एक महापालिकेचा अधिकारी असणार आहे. जिल्ह्यातील सुमारे तीन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले असून, नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एक पथक बारामती येथे मागविण्यात आले आहे.

शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. या नुकसानग्रस्तांना लवकर मदत मिळावी, यासाठी पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘नुकसान झाल्यानंतर नागरिकांना वेळीच मदत मिळाली पाहिजे, यादृष्टीने सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना पंचमाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शहरी भागात महापालिकेचे अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक असणार आहे, तर ग्रामीण भागात महसूल विभागाचे अधिकारी हे पंचनामे करणार आहेत’

तीन हजार लोक स्थलांतरीत

‘शहराबरोबरच जिल्ह्यात प्रामुख्याने बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या चार तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ९२५ कुटुंबांतील सुमारे तीन हजार लोकांना स्थलांतरीत केले आहे. बारामती तालुक्यातील कसबा, खंडोबानगर, पंचशील, साठेनगर, मळत या भागांतील सुमारे दोन हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. इंदापूर तालुक्यातील न्हावी, सणसर, लासुर्णे, निमगाव केतकी, निरा नरसिंगपूर या भागांतील सुमारे एक हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे’ असे डॉ. देशमुख म्हणाले.

६८ सर्कलमध्ये मुसळधार

‘जिल्ह्यातील १०० सर्कलपैकी ६८ सर्कलमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. नागरिकांना मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एक पथक बारामती येथे मागविण्यात आले आहे’ असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पथके

‘जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आणि प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे हे समन्वयाचे काम करणार आहेत’ अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

दोन डॉक्टर आणि नर्सची सुखरुप सुटका

‘दौंड तालुक्यातील चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन डॉक्टर आणि एक नर्स हे अडकले होते. ते रात्रभर इमारतीच्या छतावर होते. त्यांची आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून सकाळी सुखरुप सुटका करण्यात आली. दौंडमध्ये तीनजणांचे मृतदेह सापडले असून, एकजण बेपत्ता आहे. वाघोली येथे एकाचा मृतदेह आढळून आला आहे. नुकसान झालेल्यांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत’ असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here