मुंबई: राज्यातील , औरंगाबाद आणि कोकण या तीन विभागांना गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे आतापर्यंत ४८ जणांना प्राणास मुकावे लागले आहे तर लाखो हेक्टवरील हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली आहेत. शेतकऱ्यावर झालेला हा मोठा आघात असून शासनाच्या मदतीकडे सारेच आस लावून बसले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री यांनी तिन्ही विभागांतील स्थितीचा आढावा घेतला असून पंतप्रधान यांनीही मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. ( Latest Updates )

वाचा:

पुणे विभागाला सर्वाधिक फटका

पुणे: अतिवृष्टीमुळे पुण्यासह सातारा, , कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण बेपत्ता आहेत. ३२५६ घरांचे नुकसान झाले असून, सुमारे ४० हजार ३६ लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे ८७ हजार ४१६ हेक्टर जमिनींवरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील सात व्यक्ती असून, एकजण बेपत्ता आहे. साताऱ्यामध्ये दोघांचा मृत्यू, सांगलीत सहा जणांचा मृत्यू आणि तीन जण बेपत्ता आहेत. सोलापूरमध्ये १४ मृत आणि चार बेपत्ता झालेत. कोल्हापूरमध्ये जीवितहानी झाली नसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या पावसामुळे घरांचेही नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात २६५ पक्की घरे आणि शंभर झोपड्यांची पडझड झाली. साताऱ्यात २६७, सांगलीत ३६५, सोलापूरमध्ये २२५६ आणि कोल्हापूरमध्ये तीन घरांचे नुकसान झाले आहे. स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यातील ६२२१, साताऱ्यात २१३, सांगलीत १०८१ आणि सोलापूरमध्ये ३२५२१ जणांचा समावेश आहे. कोल्हापूरमध्ये नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली नाही.

वाचा:

अतिवृष्टीमध्ये जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. पुणे जिल्ह्यात १५३, साताऱ्यात ११, सांगलीत २८, सोलापूरमध्ये ८२९ जनावरे मृत्युमुखी पडली. कोल्हापूरमध्ये पशुधनाचे नुकसान झाले नाही. अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भात, सोयाबीन, भाजीपाला, कांदा, भुईमूग, बाजरी, ज्वारी, द्राक्ष, सूर्यफूल, मका, केळी, पपई या पिकांचे नुकसान झाले. पुणे जिल्ह्यातील १८ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रफळावरील पिके पाण्याखाली गेली. साताऱ्यात १४२० हेक्टर, सांगलीत ८२७६ हेक्टर, सोलापूरमध्ये ५८५८१ हेक्टर आणि कोल्हापूरमध्ये ३९३ हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पंढरपूरला पुराचा विळखा

पंढरपूर: अतिवृष्टी आणि उजनीतून सोडलेल्या विसर्गामुळे पंढरपुरात भीमेला पूर आला. या पुरामुळे शहर आणि तालुक्यातील तब्बल ३३०५ घरांमध्ये पाणी शिरले असून घरांचे आणि शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारनंतर उजनीतून येणारा विसर्ग कमी झाल्याने पंढरपूरचे पाणी ओसरण्यास रात्री उशिरापासून सुरुवात झाली असून या दोन दिवसात १७ हजारपेक्षा जास्त नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या पूर परिस्थितीत कोल्हापूरच्या वजीर रेस्क्यू फोर्स आणि व्हाइट आर्मीच्या जवानांनी शहर व तालुक्यात अनेक नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढायचे काम केले. प्रदक्षिणा मार्गावरील नागपूरकर मठाजवळ राहणारे विठ्ठल पोतदार यांचे वार्धक्याने निधन झाले होते. मात्र त्यांच्या घराजवळ तीन फुट पाणी असल्याने त्यांचा मृतदेह वजीर फोर्सच्या जवानांनी बाहेर काढून अंत्यसंस्कारासाठी सुपूर्द केला. संत पेठ येथील एका प्रसूत झालेल्या महिलेला व नवजात बालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूरकडे येणारे सर्व मार्ग पुराच्या पाण्याने बंद झाले होते. चंद्रभागेवरील नवीन पूल व अहिल्या पुलावर पाच फुटापेक्षा जास्त पाणी असल्याने शहरातून एकाही वाहनाला बाहेर पडता येत नव्हते . यामुळे शहरातील विविध मार्गांवर हजारो ट्रक्स अडकून पडले आहेत. शनिवारी सकाळपर्यंत हळूहळू पाणी कमी झाल्यावर ही वाहने बाहेर पडू शकणार आहेत.

वाचा:

शुक्रवारी शहरातील खिस्ते गल्ली, हरिदास वेस, कालिकादेवी चौक, काळामारुती, आंबेडकर नगर, घोंगडे गल्ली आदी ठिकाणी पुराचे पाणी शिरले होते. या ठिकाणी रस्त्यावर होड्या फिरताना दिसून आल्या. शहर तालुक्यात तब्बल १६ हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले. यामध्ये शहरातील स्थलांतरित नागरीकांना श्री विठ्ठल मंदिर समितीने दोन वेळचे जेवण दिले आहे. अतिवृष्टीमुळे शहरासह तालुक्यातील ९५ गावे बाधित झाली असून शहरात ६ तर भंडीशेगांव येथील १ अशा सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच तालुक्यातील ४४० घरांची पडझड झाली असून ४ बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागासह ४ हजार कुटुंबातील १६ हजार नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. शुकवारी सकाळपासून उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग हळूहळू कमी करण्यात आला. दुपारी ४ वाजता अकलूज जवळील संगम येथे १ लाख ९० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होता. तर चंद्रभागा नदी येथे २ लाख ८९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होता. तसेच संध्याकाळी पुराचे पाणी हळूहळू ओसरायला सुरुवात झाली. उजनीचा विसर्ग कमी होऊ लागल्याने चंद्रभागा नदीची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे.

कोयना एक्स्प्रेस रद्द

सांगली: सांगली ते पुणे रेल्वे मार्गावरील नांद्रे-वसगडे गावाजवळ अतिवृष्टीने येरळा नदीवरील रेल्वे पुलाचा भराव खचला. या घटनेमुळे मध्य रेल्वेने शुक्रवारी धावणाऱ्या कोयना आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द केल्या. निजामुद्दीन एक्स्प्रेस पंढरपूरमार्गे वळवण्यात आली आहे. दरम्यान, पुलाखालील खचलेल्या भागात भराव टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. मिरज जंक्शनकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे येरळा नदीला पूर आला. या पुरामुळे गुरुवारी भिलवडी आणि नांद्रे दरम्यान वसगडे येथे रेल्वे मार्गाखालील भराव खचला. हा प्रकार लक्षात येताच मध्य रेल्वेने महाराष्ट्र आणि कोयना एक्स्प्रेस रद्द केली. तसेच येणारी आणि जाणारी निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस पंढरपूरमार्गे वळवण्यात आली आहे. कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोयना एक्स्प्रेस शुक्रवारी रद्द करण्यात आली. गोंदियाहून निघालेली कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस सातार्यारत थांबवण्यात आली. मुंबईतून निघालेली कोयना एक्स्प्रेस पुण्यात थांबवण्यात आली आहे. ही एक्स्प्रेस शनिवारी पुण्यातून मुंबईला रवाना होणार आहे. रेल्वेमार्गाची दुरुस्ती होईपर्यंत कोल्हापूर ते पुणे दरम्यान कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here