म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील गोरेगावच्या आरे कॉलनीतील मेट्रो भवनच्या बहुमजली इमारतीचे बांधकाम आणि सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत साकारण्यात येणारा घरबांधणी प्रकल्प अशा दोन कामांच्या सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या निविदेत तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप ‘कॅग’च्या चौकशीत खरा ठरला असल्याचा दावा काँग्रेस पक्षाने गुरुवारी केला. या दोन्ही कामांना तातडीने स्थगिती द्यावी आणि सिडको, एमएमआरडीए आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या संगनमताने झालेल्या या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही पक्षाने केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरबांधणीसाठी सिडकोच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सुमारे १४ हजार कोटींच्या निविदा आणि मेट्रो भवनच्या कामाच्या निविदेतील कथित घोटाळा उघडकीस आणला होता. या दोन्ही कामांबाबत ‘कॅग’कडे केलेल्या तक्रारीचा चौकशीचा अहवाल आमच्या आरोपांना पुष्टी देणारा आला असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. या कथित घोटाळ्याची चौकशी राज्य सरकारने तातडीने करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

‘या दोन्ही कामांच्या निविदांमध्ये प्रचलित नियमांना बगल देऊन, तर कधी नियमांची मोडतोड करून मर्जीनुसार नव्या अटी व नियम तयार करण्यात आले. मोठ्या प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया करताना मर्जीतील कंत्राटदारांनाच काम मिळण्याची सोय करण्यात आली’, असा काँग्रेसचा गंभीर आरोप आहे. ‘या कथित घोटाळ्याची सखोल चौकशी झाल्यास अनेक मोठी नावे उघड होतील’, असा दावा सावंत यांनी केला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नवी मुंबई परिसरात ८९ हजार ७७१ घरे बांधण्याचे प्रस्तावित होते. सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या व चार भागांमध्ये विभागलेल्या प्रकल्पात ज्यांना कंत्राटे मिळाली आहेत, त्यांच्यासाठी निविदेच्या अटी व शर्ती तयार करण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेसने या निविदा प्रक्रियेबाबत माहिती घ्यायला सुरुवात केल्यानंतर प्रक्रियेत निकोप स्पर्धा असल्याचा देखावा करण्यासाठी नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी (एनसीसी) या पाचव्या कंत्राटदाराला निविदा भरण्यास सांगण्यात आले होते. परंतु, नंतर एनसीसीची निविदा बाद करून त्या बदल्यात मेट्रो भवनच्या कामाचे कंत्राट याच नागार्जुन कंपनीला देण्याचा घाट घालण्यात आला, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय तथा प्रिन्सिपल अकाऊटंट जनरल यांच्याकडे ६ सप्टेंबर २०१९ रोजी तक्रारही दाखल करण्यात आली होती. मेट्रो भवन कंत्राटांमध्ये मूळ निविदा ही याआधी एका अन्य कंत्राटदाराला हे काम मिळावे म्हणून तयार करण्यात आली होती. परंतु, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नागार्जुना कंपनीने केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी या कंपनीला हे कंत्राट मिळावे म्हणून मूळ निविदेमध्ये १३ बदल करण्यात आले. त्यानंतरही शुद्धीपत्रक क्रमांक ६, ८ आणि १० काढून पुन्हा बदल करण्यात आले, असा काँग्रेसचा दावा आहे.

काँग्रेसने केलेल्या तक्रारीची ‘कॅग’ने दखल घेतली असून, यासंदर्भातील चौकशीमध्ये ‘कॅग’ला तथ्य आढळले आहे, असा दावा काँग्रेसने केला. एमएमआरडीएतर्फे आलेले स्पष्टीकरण ‘कॅग’ने नाकारल्याचे दिसते, असे सांगत, ‘मेट्रो भवनच्या कामासाठी वाटाघाटी करण्यात येऊन प्रथम ७३ कोटींची किंमत कमी करण्यात आली. नंतर त्या कामाचा प्रकल्प आराखडा बदलून वरचे मजले कमी करून तपशील बदलण्यात आला. यामुळे अजून ११७ कोटी रुपये कमी झाल्याचे दाखविण्यात आले. हा प्रकार केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारा आहे’, असा गंभीर आरोप सावंत यांनी केला.

‘कॅग’ने ओढलेले ताशेरे

-निविदेत अनुभवाची अट स्पष्ट नमूद नव्हती.

-प्रकल्प गुंतागुंतीचा असल्याने काटेकोर पात्रता निकष देण्याची आवश्यकता होती.

-निविदेमध्ये सातत्याने होणारे बदल अनेक निविदाधारकांना कळवण्यात आले नाहीत.

-अत्यंत मोठ्या व जटील प्रकल्पाकरता तयारी नसल्याने निविदाधारकांचा गोंधळ उडाल्याने कमी प्रतिसाद मिळाला.

-यासंदर्भात एमएमआरडीएने दिलेले उत्तर उडवाउडवीचे असून, निविदा जारी केल्यानंतर इतके बदल कशासाठी केले याचे समाधानकारक उत्तर त्या यंत्रणेकडून मिळाले नाही.

-निविदा उघड केल्यानंतर वाटाघाटीतून कामाचा तपशील बदलण्यात येऊन एकूण बिल्टअप एरिया १ लाख १२ हजार २२० चौ. मीटरवरून ९० हजार ०४७ चौ. मीटरपर्यंत कमी करण्यात आला.

-दोन मजली बेसमेंटचा भाग हा ऑपरेशन आणि कंट्रोल सेंटरपासून बाजूला काढण्यात आला.

-मेट्रो भवन इमारतीचे मजले ३२ वरून २७ इतके कमी करण्यात आले.

-प्रकल्पामध्ये निविदेपूर्वी प्रकल्पाचा आराखडा निर्धारित न केल्यामुळे अनेकांना निविदा प्रक्रियेत भाग घेता आला नाही.

भाजपने आरोप फेटाळले

मेट्रो भवन आणि सिडकोतील प्रधानमंत्री आवास योजनेतील कथित घोटाळ्यांबाबत काँग्रेसने केलेला आरोप भाजपने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. अशा आरोपांमध्ये काडीचेही तथ्य नाही, असे सांगत, ‘काँग्रेसला विरोधी पक्षात असताना विरोधकांसारखे वागता आले नाही. आता सत्तेत असताना सत्ताधाऱ्यांसारखे वागता येत नाही. नुसती पत्रकबाजी व चिखलफेक करण्याचा काँग्रेसचा उद्योग सुरू आहे’, असे भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी प्रतिक्रिया देताना म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here