मुंबई: आज सकाळी सायन आणि माटुंग्या दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मुंबईकरांची लाइफलाइन असलेली मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचं काम तातडीने हाती घेतलं आहे.

आज सकाळी ७ वाजून २० मिनिटाच्या सुमारास सायन आणि माटुंग्या दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची अप धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळीच रेल्वेचा बोजवारा उडाल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. रेल्वे रुळाला तडा गेल्याने लोकल १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना ऐन गर्दीतून प्रवास करावा लागत आहेत. लोकल उशिराने धावत असल्याने कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, ठाणे आदी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले असून रेल्वे सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ जाईल असे समजते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here