गेल्या आठवड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. त्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी राज्यातून सर्वप्रथम शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्यात पोचले. रविवारी सकाळी त्यांनी काक्रंबा (ता. तुळजापूर) परिसरात शेतीची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. आमचं सगळ शेतच वाहून गेलं या शब्दात शेतकऱ्यांनी पवार यांच्यासमोर अडचणी मांडल्या. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यावेळी उपस्थित होते.
“राज्यावर आलेले हे अस्मानी संकट आहे. याचा आपण एकत्रितपणे सामना करू. शेतकऱ्यांकडे ताकद नसली की सरकार ती उभी करते. राज्य सरकारच्या मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. केंद्राने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत,” असे पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार विक्रम काळे, संजय निंबाळकर, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
तुळजापूर तालुक्यासह पवार यांनी उमरगा, लोहारा तालुक्यांतील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. झालेले नुकसान एक दिवसात भरुन येणारे नाही, अनेक ठिकाणी जमीनच खरडून गेली आहे. हे नुकसान मोठे आहे, असे पवार यांनी पाहणी दौऱ्यानंतर सांगितले. त्यांनी सास्तूर, राजेगाव, कवठा व परिसरातील शिवारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिस्थितीची आणि शेतकरी बांधवांची अवस्था पवार यांनी जाणून घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
“शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती उस्मानाबाद सोबतच राज्यातील अनेक ठिकाणी झाली आहे. शक्य तितकी व लवकर मदत देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. परंतु, नुकसानीचे प्रमाण लक्षात घेता एकटे राज्य सरकार पुरणार नाही. त्यासाठी केंद्राचीही मदत घ्यावी लागणार आहे. आम्ही लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊन याविषयी चर्चा करून केंद्राची मदत घेवू,”असे आश्वासन पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times