सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवराय यांच्या तेराव्या वंशजांसोबत धाकल्या राजांनी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून ऐन विधानसभेच्या निवडणुकीत हाती कमळ घेतले. पक्षनिष्ठे पेक्षा व्यक्ती निष्ठा जपणाऱ्या साताऱ्यातील काही रेडिमेड कार्यकर्त्यांनीही घड्याळाची साथ सोडली होती. व्यवसायिकपणा त्यांच्या अंगात भिनला होता. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील तसेच युवा पिढीला आकर्षित करणारे कोरेगावचे आ. शशिकांत शिंदे,कराडचे आ. बाळासाहेब पाटील,वाईचे आ. मकरंद पाटील या त्रिकूटांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत प्रचाराची धुरा सांभाळली होती. परंतु,सत्ताधारी भाजप पक्षातून आर्थिक पाठबळ,घराणेशाहीचे वलय, उमेदवारी बद्दल आकस या गोष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिछाडीवर असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यातूनच भाजपचे सर्वसर्वा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातारा शहरातील सैनिक स्कूल मैदानावरील दुपारची जाहीर सभा, राजघराण्यातील उमेदवारांचा कौतुक यामुळे भाजपमध्ये कमळाचा सुगंध दरवळत होता. अशातच १८ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर सभेचे आयोजन केले होते. सर्व प्रमुख नेतेगण, उमेदवार व कार्यकर्तेही सभेत जोश आणत होते. पण, हे सर्व उसने अवसान असल्यासारखे भासत होते. सर्वांच्या नजरा जेष्ठ नेते यांच्याकडे लागल्या होत्या. वाट पहात थांबलेले लोक घड्याळाकडे पाहून चलबिचल करू लागले. त्यातच वारे वाहत पावसाचे आगमन झाले. आता सारं काही संपलं असे वाटत असतानाच विचारपिठाच्या दिशेने ऐंशी वर्षाचे राजकारणातील शिलेदार जेष्ठ नेते शरद पवारांनी माईक हाती घेतला. डोक्यावर धरलेली छत्री बाजूला काढण्याची कार्यकर्त्याला सूचना केली. विचारपीठावरील मान्यवरांच्या समवेत राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, पार्थ पोळके, शफीक शेख, संतोष कणसे गहिवरले. पवारसाहेबांनी, सातारकरांची नाळ ओळखून भिजतच उपस्थितांना शाब्दिक सल्ले दिले. पावसाचे थेंब आणि पवारसाहेबांनी दिलेला सल्ला अनेकांना पटला. त्यातून इतिहास घडला. या सभेने दस्तुरखुद्द उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. अशी नोंद झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस नेते काहीनी गद्दारी केल्याने कोरेगावच्या राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांना पराभूत व्हावे लागले. पण, गड आला पण, सिंह गेला असे वर्णन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयी सभा रद्द केली होती. या वर्षपूर्तीने सातरकरांनी आठवणींनी उजाळा दिला. आता त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कामकाज होत आहे का? हे पाहण्यासाठी आदरणीय पवारसाहेबांनी पुन्हा एकदा साताऱ्यात येऊन भिजावे अशी मागणी गोरगरीब जनता व मागासवर्गीय, अल्पसंख्याक, इतर मागासवर्गीय मतदार करू लागले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times