अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी शरद पवार कालपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी तुळजापूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शेतीच्या प्रश्नासोबतच त्यांना अनेक राजकीय प्रश्न विचारण्यात आले. खडसे यांच्याबद्दल ते काय बोलतात याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. खडसे राष्ट्रवादीत येणार की नाही याबाबत पवार थेट काहीही बोलले नसले तरी त्यांनी खडसेंच कौतुक केलं.
‘एकनाथ खडसे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान आहे. एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते होते. अर्थमंत्री होते. आम्हाला शिव्या घालत होते. पण विरोधकांच्या बाजूने ते प्रखरतेने दिसत होते. दुर्दैवानं त्यांची नोंद घेतली गेली नाही असं त्यांना वाटतं. त्यामुळं जिथं नोंद घेतली जाईल, तिथं जाण्याचा त्यांचा विचार असल्याचं समजतं. एखाद्या पक्षाबद्दल त्यांना विश्वास वाटत असेल तर आम्ही काय करू शकतो,’ असा प्रतिप्रश्नही पवारांनी केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा घेतलं जाणार आहे का याबाबत विचारलं असता, ‘गेलेत तिथं त्यांनी सुखी राहावं’ असं पवार म्हणाले.
वाचा:
एकनाथ खडसे यांनी अद्याप स्वत: आपल्या पक्षांतराविषयी कुठलीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही. काल त्यांच्या राजीनाम्याची अफवाही पसरली होती. मात्र, तिचं त्यांनी खंडन केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही खडसे असा कुठलाही निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, पवारांच्या आजच्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times