गेल्या आठवड्यात अतिवृष्टीने झोडपून काढल्याने सांगली जिल्ह्यातील शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील शिराळा आणि जत हे दोन तालुके वगळत उर्वरित आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले. आटपाडी तालुक्यात सरासरीच्या दुपटीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने ६७ पूल, बंधारे आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटल्याने दळणवळण ठप्प आहे. डाळींब बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. खानापूर, विटा, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव आणि पलूस परिसरात द्राक्ष बागांचे नुकसान झाले. इस्लामपूर, शिराळा, कडेगाव परिसरात मका, सोयाबीन, भुईमूग, भात हातचे गेले. ऊस, हळद, आले या पिकांनाही फटका बसला आहे.
ऐन सुगीच्या दिवसात आलेल्या पावसाने शेतक-यांच्या हंगामावर पाणी
दसरा आणि दिवाळीचे सण तोंडावर असताना आलेल्या आस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून पडले आहेत. या स्थितीत प्रत्यक्ष मदतीची गरज असताना लोकप्रतिनिधींकडून केवळ पाहणीचा फार्स सुरू असल्याची नाराजी शेतकरी व्यक्त करीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मिरज, आटपाडी, जत, खानापूर परिसरात पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तासगाव परिसरातील द्राक्ष बागांची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधला. याशिवाय जिल्ह्यातील सर्व आमदारांनी त्यंच्या मतदार संघातील पिकांची पाहणी केली. मंगळवारपासून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सांगलीच्या दौ-यावर आहेत. नेत्यांचे दौरे होत असले तरी, प्रत्यक्ष मदत हातात मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. मदत देण्याची इच्छा असेल तरच नेत्यांनी पाहणी करावी, अन्यथा शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी पाहणी दौरे करू नयेत, अशा तीव्र भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times