म. टा. प्रतिनिधी, नगर : शहरात आज पहाटे चोरट्यांनी तीन दुकाने फोडून केली. चोरी करण्यासाठी चोरटे रिकाम्या हाताने आले असावेत. चोरीचा माल भरून नेण्यासाठी त्यांनी किराणा दुकानातीलच गोण्या वापरल्याचे आढळून आले. या गोण्यांतील माल दुकानातच ओतून देऊन, त्या गोण्यांमध्ये किंमती वस्तू भरून नेल्याचे दिसून येते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेचा तपास सुरू केला असून, अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत.

जामखेड शहरातील बीड रस्त्यावरील विजय कॉम्प्लेक्स या इमारतीमधील तीन दुकाने पहाटे फोडण्यात आल्याचे आढळून आले. यामध्ये मोबाइल शॉपी, चपलांचे दुकान आणि किराणा दुकानाचा समावेश आहे. चोरट्यांनी किराणा दुकानातील गोण्यांतील डाळी, धान्य, मिरच्या ओतून देत त्या रिकाम्या केल्या. त्यात महागड्या चपला, बूट भरून नेले. मोबाइल शॉपीमधील महागडे मोबाइल आणि त्यांचे सुटे भाग चोरून नेल्याचे आढळून आले. किराणा दुकानातही चोरट्यांनी चोरी केली. तेथील गावरान तुपाचे डबे, तेलाच्या बाटल्या यांच्यासह किंमती वस्तू चोरून नेल्या.

पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली असावी. त्या भागात गस्त घालणाऱ्या खासगी सुरक्षारक्षकाला दुकानांत चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्याने ही माहिती संजय गुगळे आणि तेजस कोठारी यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ज्यांची दुकाने फोडण्यात आली होती, त्या दुकानदारांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी पथकासह येऊन घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांनी चोरीचा माल घेऊन पळून जाण्यासाठी वाहनाचा वापर केला असावा. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बीड रोड या प्रमुख बाजारपेठ असलेल्या भागात चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here