जळगाव जिल्ह्यातील वजनदार नेते म्हणून खडसेंची ओळख आहे. राज्य सरकारमध्ये मंत्री, विरोधी पक्ष नेते अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. खडसे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असतानाच पक्षानं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून घोषित केले. तेव्हापासूनच खडसे नाराज होते. मागच्या काही वर्षापासून ते पक्षाचा राजकारणापासूनही दूर होते. आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना होती. त्यांनी कित्येकतदा त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. मात्र, पक्षनेतृत्वाकडून त्यांची एकदाही दखल घेण्यात आली नाही.
१५ वर्षांनंतर सत्तेत आलेल्या युती सरकारमधील खडसे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल वादात अडकले होते. भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या कथित भूखंड घोटाळाप्रकरणी त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळ देवेंद्र फडणवीस यांना खडसेंची ४० वर्षांची राजकीय कारकीर्दी संपुष्टात आणण्यासाठी फडणवीसांनी रचलेला डाव असल्याची, चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. खडसे कथित घोटाळ्यात अडकल्यानंतर भाजप अध्यक्षांकडून मदतीची अपेक्षा होती मात्र, ती सुद्धा फोल ठरली.
गेली ४० वर्ष राज्यात भाजपला बळकटी देण्याचं काम खडसेंनी केलं. त्याबदल्यात खडसेंवर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडूनही व्यक्त होत होती. २०१९च्या लोकसभा निवडणूकीतही खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे यांना तिकिट मिळवून देण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. तसंच, विधानसभा निवडणुकीतही खडसेंन पक्षाकडून डावलण्यात आलं होतं. खडसेंची कन्या रोहणी खडसे यांना भाजपनं तिकीच दिलं होतं. मात्र, शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंचा अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव केला. त्याचबरोबर, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीतही खडसेंना स्थान देण्यात आले नव्हते.
महाराष्ट्रातील पक्षाविस्तारासाठी ४० वर्ष एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या बाजून साथ दिली. मात्र, पक्षातील अंतर्गंत राजकारणामुळं व अन्याय होत असल्याच्या भावनेनं खडसेंनी भाजपला राम राम करून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आता राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंना कोणते स्थान मिळणार, या बाबत उत्सुकता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times