गुरुबाळ माळी, कोल्हापूरः काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ‘कमळ’ फुलविलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील भाजपमध्ये अलिकडे मात्र धुसफूस वाढली आहे. विधानसभेला त्याचा मोठा फटका बसल्यानंतरही दुखण्यावर फुंकर मारण्याची तसदी न घेतल्याने पक्षातील असंतोष वाढत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आतल्या आत धुमसत असलेल्या वादाला उकळी येण्यासाठी कोणत्यातरी निवडणुकीची प्रतिक्षा लागली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पक्षातील असंतोषाला वाट मोकळी करून दिल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील पक्षातील वादाची चर्चा सुरू झाली आहे. मुळात हा भाग काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांच्या हातात कमळ देत प्रदेशाध्यक्ष यांनी दुष्काळात कमळ फुलवला. आयात नेत्यांना मोक्याची आणि मोलाची पदे दिली. त्यांचा वापर करत महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेची सत्ता मिळवली. पण नंतर पदे कमी आणि आश्वासने जास्त अशी अवस्था झाल्याने अनेकजण नाराज झाले आहेत. काही प्रकरणात निष्ठावंतांना डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली. यातूनच पक्षात खदखद वाढली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यात ही खदखद असून ती व्यक्त करण्यासाठी अनेकांना कोणत्यातरी निवडणुकीची प्रतिक्षा लागली आहे.

दक्षिण महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील यांची पक्षावर पकड घट्ट आहे. त्यांच्या समंतीशिवाय पक्षात कोणतेही पान हलत नाही. दुसरीकडे त्यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रत्येकाचे समाधान करण्यात अडचणी येत आहेत. यामुळेच वादाला फोडणी पडत आहे. कोल्हापुरात जिल्हाध्यक्षपद न मिळाल्याने सुभाष रामुगडे, आर. डी. पाटील, संपतराव पवार, सुरेश जरग असे काहीजण नाराज आहेत. त्यांच्यासह अनेकांनी इतर पक्षात जाण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपचे अनेक कार्यकर्ते शिवसेना अथवा काँग्रेसचा झेंडा हातात घेण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्ह्यात खासदार विरोधात आमदार हे चित्र सतत पहायाला मिळत आहे. सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर हे तीनही आमदार खासदार संजय पाटील यांना पाण्यात बघतात. पक्षातील या वादाचा फटका विधानसभेला बसला. विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक यांना यामुळे पराभूत व्हावे लागले. पक्षातील असंतोषाला महापालिकेत तोंड फुटले आहे. बहुमत असतानाही स्थायी समिती सभापती निवडणुकीत पक्षाला विजयासाठी प्रचंड झगडावे लागले. बाजार समितीच्या अनेक संचालकांनी भाजपला रामराम करत हातात ‘घड्याळ’ बांधले. ही सुरुवात आहे. अजूनही अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. ते फक्त संधीच्या शोधात आहेत.

सातारा जिल्ह्यात पक्षाची फारशी ताकद नाही. जयकुमार गोरे व शिवेंद्रराजे भोसले हे दोन आमदार असले तरी दोघांवरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शिक्का आहे. खासदार उदयनराजे पक्षाचे खासदार असले तरी पक्षापेक्षा त्यांच्या मताला अधिक महत्त्व असते. दुसरे खासदार रविराज निंबाळकर मोदी लाटेत निवडून आले तरी त्यांच्यावरही काँग्रेसचाच शिक्का आहे. सारेच बाहेरून आल्याने आणि मुळात पक्षाचीच फारशी ताकद नसल्याने जे नेते आहेत, त्यांच्यात फारसा ताळमेळ नाही. यामुळे त्यांच्यात खदखद असली तरी व्यक्त करायलाच फारशी संधी नाही. सत्ता, निवडणुका आणि पदांबाबत वाद घालण्यासारखी या जिल्ह्यात फारशी स्थिती नाही, त्यामुळे किरकोळ खदखद असली तरी जिल्ह्याच्या पलिकडे त्याचे पडसाद उमटत नाहीत.

दक्षिण महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा मोठा विस्तार केला आहे. राज्यात सत्ता असताना त्यांनी अनेकांना पदे दिली. पण, आता सत्ता नसल्याने अपेक्षापूर्ती करण्यात अडचणी येत आहेत. काहींना घरवापसी करण्यासाठी कारण हवे आहे. येत्या पाच सहा महिन्यानंतर महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि साखर कारखान्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यावेळी पक्षातील अंतर्गत वादाला नक्कीच उकळी फुटण्याची चिन्हे आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here