अमरावती सत्र न्यायालयाने ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह तिघांना तीन महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात करण्यात आलेल्या अपीलवर गुरुवारी सुनवाणी झाली. सुनावणीदरम्यान शिक्षेचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत राज्य सरकारला शपथपत्र सादर करण्याचा आदेश दिला. याप्रकरणी ॲड. यशोमती ठाकूर यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. कुलदीप महल्ले यांनी सहकार्य केले. राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील जोशी यांनी नोटीस स्वीकारली.
काय आहे प्रकरण?
अॅड. यशोमती ठाकूर या आपल्या वाहनाने काही कार्यकर्त्यांसह २४ मार्च २०१२ रोजी दुपारी ४.१५ वाजता चुनाभट्टी ते गांधी चौक या एकेरी मार्गाने जात होत्या. हा प्रकार निदर्शनास आल्यावर कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी त्यांचे वाहन अडविले. हा एकेरी मार्ग असल्याचे सांगून त्यांनी वाहन घेऊन जाण्यास चालकास मनाई केली.
त्यावर ॲड. ठाकूर यांच्यासह चालक सागर, कार्यकर्ते शरद जवंजाळ व राजू इंगळे यांनी वाहनाखाली उतरून उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घातला. कॉलर पकडून त्यांना मारहाण केल्याची तक्रार रौराळे यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३५३, ३३२, १८६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times