मुंबई: यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटचे एक युग संपले, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बापू नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली. भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही ट्विटच्या माध्यमातून बापूंच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

अचूक मारा करणारा गोलंदाज अशी बापूंची ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटचे स्नेही होते. अनेकदा ते ‘मातोश्री’वर येत. गप्पांची मैफल जमत असे. बाळासाहेबांबरोबर रेल्वे प्रवास करणारी जी टीम होती त्यात बापू होते. देश बापूंच्या दिलदार खेळीचे सदैव स्मरण ठेवेल. बापूंना माझा मानाचा मुजरा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बापूंबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या व त्यांना श्रद्धांजली वाहिली.

भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही बापूंबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. कसोटीत सलग २१ निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम करणारा फिरकीपटू ही बापूंची ओळख डोळ्यापुढे ठेवतच मी माझी क्रिकेटमधील वाटचाल केली, असे सचिनने आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

बापू नाडकर्णी यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटमधला एक उमदा अष्टपैलू खेळाडू हरपला. सलग निर्धाव २१ षटकांच्या विक्रमामुळे त्यांना जगातला सर्वात कंजूष फिरकी गोलंदाज म्हटलं गेलं. बापू नाडकर्णी यांच्या निधनाने क्रिकेटच्या एका युगाचाच अंत झाल्याची खंत वाटते, अशा भावना आयसीसीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या.

अचूक गोलंदाजी करतानाच, निर्धाव षटके टाकून समोरच्या फलंदाजाला बेजार करण्यासाठी ओळखले जाणारे बापू नाडकर्णी आज आपल्यातून निघून गेले.
महाराष्ट्रातील या महान क्रिकेटपटूला मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

बीसीसीआयनेही बापूंच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी बापूंनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाला उजाळा देत नाडकर्णी कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here