कल्पेशराज कुबल

ऐतिहासिक सिनेमे, जीवनपट करताना सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याचं अनेकदा बॉलिवूडकडून सांगितलं जातं. पण, ‘लिबर्टी म्हणजे सिनेमात काहीतरी खोटंनाट दाखवणं असं हल्ली झालं आहे. हे अत्यंत चुकीचं आहे’, असं ”चा () दिग्दर्शक ओम राऊतनं ‘मुंटा’शी गप्पा मारताना सांगितलं.

० छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड कशी झाली?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड करणं खरं तर खूप अवघड होतं. अनेक कलाकारांकडे मी महाराजांच्या भूमिकेसाठी विचारणा करत होतो. जोपर्यंत मला पूर्ण विश्वास नव्हता, तोपर्यंत मी महाराजांच्या भूमिकेचं कास्टिंग राखून ठेवलं. माझ्या मनात शरद केळकर हे नावं आलं आणि मी लगेच त्याच्याशी संपर्क साधला. मेकअप डिझाईनर विक्रम गायकवाड यांनी पहिल्या भेटीतच शरदची रंगभूषा केली. मेकअप पूर्ण झाल्यावर जेव्हा मी पहिल्यांदा शरदला पाहिलं, तेव्हा साक्षात शिवरायच माझ्या समोर उभे होते. सिनेमा स्क्रीनवर आम्ही व्हीएफएक्सच्या मदतीनं शरदच्या चेहऱ्यावर काही अंशी काम केलं आहे. बाकी भूमिकेचं संपूर्ण श्रेय त्याचंच आहे.

० तुझ्या सिनेमात व्हीएफएक्सचं प्रमाण अधिक असतं. त्यामागचं गणित काय आहे?

व्हीएफएक्स हे मॉडर्न फिल्म मेकिंग आहे. ते पैसा वाचवण्याचं साधन नाही. किंबहुना पैसे आणि श्रम यात अधिक खर्च होतात. ज्या गोष्टी पडद्यावर तुम्हाला करता येत नाहीत त्या उभारण्यासाठी व्हीएफएक्स करायचं हा गैरसमज आहे. तर, ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे आणि विशिष्ट प्रमाणात करायच्या आहेत त्यासाठी व्हीएफएक्स वापरलं जातं. मला माझ्या सिनेमात जे जग उभं करायचं आहे, त्यासाठी व्हीएफएक्स हे एक आदर्श माध्यम आहे. पुन्हा मी सांगेन की व्हीएफएक्स हा शॉर्टकट नाही.

० काही कथांमध्ये तान्हाजीकडे असलेल्या घोरपडीचा उल्लेख आहे; परंतु सिनेमात आपल्याला घोरपडे बंधू दिसतात. असं का?

कोंढाण्याची लढाई १६७० साली झाली. त्यांनतर १८३०च्या सुमारास एक पोवाडा लिहिला गेला, ज्यात घोरपडीचा उल्लेख आहे. त्यामुळे तो पोवाडादेखील आपल्यासाठी अर्वाचीन आहे. लहानपणी आपल्या कानावर पडलेल्या कथेत त्या घोरपडीचा उल्लेख आहे. परंतु ऐतिहासिक बखरीत घोरपडीचा उल्लेख नाही. शालेय पाठ्यपुस्तकातही घोरपडीचा उल्लेख नाही. शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर; घोरपडीच्या सहाय्यानं कडा सर करणं शक्य नाही. त्यामुळे सिनेमात घोरपड नाही. पण, मराठ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याविषयी, किल्ला सर करण्याविषयी अनेक संदर्भ इतिहासात आहेत. म्हणून मी सिनेमातही घोरपडे बंधू दाखवले आहेत. पण, हे करत असताना आपण सिनेमॅटिक लिबर्टीचा दुरुपयोग करू नये. कथानकाला अधिक प्रभावशाली करण्यासाठी सिनेमॅटिक लिबर्टी वापर केला जावा. ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ या शब्दाचा गैरफायदा हल्ली घेतलेला दिसतो. पण, हे चुकीचं आहे.

० तुझा यापूर्वीचा सिनेमा २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता; त्यानंतर ‘तान्हाजी’ येण्यासाठी साधारण पाच वर्ष लागली. एवढा वेळ लागण्यामागचं कारण?
कोणत्याही गोष्टीत जोपर्यंत मी शंभर टक्के ठाम नसेन, तोपर्यंत मी ती करत नाही. प्रत्येक गोष्ट मी तोलून-मापून करण्याचा प्रयत्न करतो. मग ते सिनेमासाठीचं संशोधन असू दे, स्क्रीप्टिंग किंवा कास्टिंग. आपण जेव्हा ऐतिहासिक सिनेमा करत असतो तेव्हा त्या सिनेमासाठी खूप रिसर्च आवश्यक असतो. कथानकाच्या विविध संदर्भांपासून तेव्हाचे पोशाख, शस्त्रसामग्री, गड-किल्ल्यांचा परिसर आदी सगळ्यांचा अभ्यास करणं अपेक्षित होतं; आणि तेच मी गेल्या काही महिन्यांमध्ये केलं. या सर्व प्रक्रियेमध्ये हा काळ गेला.

सिनेमाची भाषा हिंदी, मराठी, फ्रेंच किंवा इंग्रजी असो, सिनेमा हा सिनेमा असतो. माझ्या चित्रपटातली गोष्ट मला संपूर्ण जगासमोर ठेवायची आहे. ‘तान्हाजीं’ची वीरगाथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायची असल्यानं मी हिंदीची निवड केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here