आबुधाबी: बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी मुंबईच्या गोलंदाजीचा आज चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. स्टोक्सने यावेळी धडाकेबाज शतक झळकावले, तर संजूने धमाकेदार अर्धशतक पूर्ण केले. स्टोक्सने यावेळी ६० चेंडूंत १४ चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर नाबाद १०७ धावांची अफलातून खेळी साकारली. दुसरीकडे संजूने ३१ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ५४ धावा केल्या. या दोघांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे राजस्थानला मुंबईवर आठ विकेट्स राखून विजय मिळवता आला. या विजयासह राजस्थानने या आयपीएलमधील आपले आव्हान कायम राखले आहे.

मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सपुढे यावेळी १९६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला सुरुवातीला दोन धक्के बसले होते. पण त्यानंतर स्टोक्स आणि संजू यांनी मुंबईच्या गोलंदाजीवर कडक प्रहार करत चौफेर फटकेबाजी केली. स्टोकेसने यावेळी धडाकेबाज शतक झळकावले, तर संजूने आपेल अर्धशतक पूर्ण केले आणि राजस्थानला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

मुंबई इंडियन्सच्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. कारण मुंबईच्या संघात पुनरागमन करणाऱ्या जेम्स पॅटीन्सनने यावेळी राजस्थानच्या संघाला दोन धक्के दिली. जेम्सने पहिल्यांदाच सलामीवीर रॉबिन उथप्पाला बाद केले. उथप्पाला यावेळी १३ धावा करता आल्या. उथप्पानंतर जेम्सने राजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथचा त्रिफळाचीत करत संघाला मोठे यश मिळवून दिले. स्मिथला यावेळी ११ धावांवर समाधान मानावे लागले.

दोन धक्के बसल्यावर राजस्थानचा संघ पिछाडीवर जाईल, असे वाटले होते. पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. स्टोक्सने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करताना २८ चेंडूंत आपले अर्धशतकही झळकावले. त्यानंतरही या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी सुरुच ठेवली. संजूनेही यावेळी तुफानी फलंदाजी करत २७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतकही झळकावले.

मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याने आजच्या सामन्यात वादळी खेळी साकारली. हार्दिकने यावेळी राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. हार्दिकने यावेळी फक्त २१ चेंडूंत दोन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ६१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. हार्दिकच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईला राजस्थानपुढे १९६ धावांचे मोठे आव्हान ठेवता आले.

मुंबईला पहिल्याच षटकात धक्का बसला असला तरी त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली भागीदारी रचली. इशान आणि सूर्यकुमार यांनी यावेळी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी रचली. यावेळी इशानपेक्षा सूर्यकुमार हा जलदगतीने धावा जमवत होता. पण यावेळी इशानचा अप्रतिम झेल जोफ्रा आर्चरने पकडला आणि मुंबईला दुसरा धक्का दिला. इशान किशनने यावेळी चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३७ धावा केल्या.

इशान किशन बाद झाला आणि त्यानंतर मुंबईला झटपट दोन धक्के बसले. खेळपट्टीवर स्थिरस्थावर झालेल्या सूर्यकुमारला यावेळी राजस्थानच्या श्रेयस गोपाळने बाद केले. सूर्यकुमारने यावेळी २६ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४० धावा केल्या. सूर्यकुमार बाद झाल्यावर मुंबईचा हंगामी कर्णधार किरॉन पोलार्ड फलंदाजीला आला. पोलार्डने षटकार लगावत आपले इरादे स्षट केले. पण पोलार्डला यावेळी या सहा धावांवरच समाधान मानावे लागले. कारण गोपाळने यावेळी पोलार्डला त्रिफळाचीत करत मुंबईला मोठा धक्का दिला. पण त्यानंतर हार्दिकच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर मुंबईला मोठा धावसंख्या उभारता आली. सौरभ तिवारीनेही यावेळी जलदगतीने धावा जमवल्या. तिवारीने यावेळी २५ चेडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३४ धावांची खेळी साकारल्याचे पाहायला मिळाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here