‘डीजीसीए’च्या निर्देशनानुसार रविवारपासून २७ मार्चपर्यंत देशांतर्गत विमान सेवेत केवळ १२९८३ उड्डाणे होतील. सर्वसाधारणपणे दिवाळी आणि नाताळची शाळांना सुट्टी असल्याने हा काळ पर्यटनाचा हंगाम मानला जातो. या काळात रेल्वे आणि विमान प्रवाशी संख्येत मोठी वाढ होते. मात्र यंदा करोनाने सर्वच व्यवसायांवर पाणी फेरले आहे. करोनाचा प्रसार पाहता नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सावधगिरी बाळगली आहे. यंदाच्या सुट्टीच्या हंगामासाठी १२९८३ स्थानिक विमान उड्डाणांना परवानगी दिली आहे. गत वर्षाच्या तुलनेत ही संख्या ४४ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते मार्च या काळात २३३०७ विमान फेऱ्या झाल्या होत्या.
यंदाच्या हंगामासाठी इंडिगोच्या ६००६ विमान फेऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्या खालोखाल स्पाईसजेटला १९५७ आणि गो एअरच्या १२०३ देशांतर्गत विमान उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. सध्या देशांतर्गत विमान सेवेसाठी कंपन्यांना ६० टक्के उड्डाणाची परवानगी आहे.
तब्बल अडीच महिने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद होती. २५ मे रोजी देशांतर्गत विमान सेवेला प्रारंभ झाला होता. सुरुवातीला ३३ टक्के आसन क्षमेतची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर त्यात २६ जून रोजी वाढ करण्यात आली. जवळपास अडीच महिन्यांनंतर १७ जुलैपासून देशात आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु झाली होती. करोना रोखण्यासाठी लागू केलेल्या कठोर लॉकडाउनमुळे २३ मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंदी घालण्यात आली होती. या काळात केवळ वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाची विशेष विमान सेवा सुरु होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times