मुंबई : न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात कुणाचं पुनरागमन होणार आणि कुणाला डच्चू मिळणार हे रविवारी स्पष्ट होणार आहे. पण यात दोन नावांकडे लक्ष लागलं आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेला केएल राहुल आणि दुसरं नाव म्हणजे पृथ्वी शॉ. हे दोघेही सलामीवीर फलंदाज पुनरागमनासाठी सज्ज आहेत. एकीकडे मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा ही सलामीवीर जोडी कसोटीत हिट ठरली असताना नवीन काय बदल होतात ही उत्सुकता आहे.

केएल राहुल आणि पृथ्वी शॉसोबतच अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या फिटनेसचाही आढावा घेतला जाणार आहे. दुखापतीमुळे काही दिवसांपासून तो संघातून बाहेर आहे. दुसरीकडे केएल राहुल टी-२० आणि वन डे क्रिकेटमध्ये नियमित खेळत आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर तो कसोटी संघातून बाहेर होता. राहुलसारख्या खेळाडूला संघातून बाहेर ठेवणं कठीण असल्याचं कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शुबमन गिल आणि पृथ्वी शॉ या दोघांवरही तो भारी पडू शकतो.

गोलंदाजीत काय बदल होणार
?

कुलदीप यादवच्या रुपाने तिसरा फिरकीपटू ठेवण्याऐवजी नवदीप सैनी हा चांगला पर्याय भारतीय संघाकडे तयार झाला आहे. न्यूझीलंड दौऱ्यात रविचंद्रन अश्विन किंवा रवींद्र जाडेजा या दोघांपैकी एकालाच अंतिम ११ मध्ये संधी मिळू शकते. शिवाय हार्दिक पंड्या फिट होण्याचीही भारतीय संघ व्यवस्थापनाला प्रतिक्षा आहे. तो फिट झाल्यास त्याचं वन डे संघात पुनरागमन निश्चित मानलं जात आहे.

कसोटीत गोलंदाजीच्या बाबतीत पंड्या अपयशी ठरला होता. त्यानंतर त्याचे खाजगी प्रशिक्षक एस रजनीकांत यांनी त्याला भारत अ दौऱ्यातून माघार घेण्याचा सल्ला दिला होता. हार्दिक पंड्या फिट न झाल्यास निवडकर्ते सूर्यकुमार यादववर विश्वास दाखवू शकतात.

वन डे संघात अजिंक्य रहाणेच्या नावावरही विचार केला जाऊ शकतो. केदार जाधवच्या जागी अजिंक्य रहाणेचा विचार होऊ शकतो. बीसीसीआयमधील सूत्रांनी गोपनीयतेच्या आधारावर दिलेल्या माहितीनुसार, ‘केदार जाधव निश्चितपणे २०२३ च्या विश्वचषकात खेळणार नाही आणि तो सध्या गोलंदाजीही करत नाही. तो टी-२० संघाचाही भाग नाही. त्यामुळे तो न्यूझीलंड दौऱ्यात असण्याला काही अर्थ नाही. सूर्यकुमार आणि रहाणे यांच्यापैकी एकाला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.’

दरम्यान, गेल्या रविवारीच न्यूझीलंड दौऱ्यासाठी टी-२० संघाची घोषणा करण्यात आली होती. भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात ऑकलंडमधील पहिल्या टी-२० सामन्याने होईल. या दौऱ्यात पाच टी-२० सामने, तीन वन डे सामने आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येईल.

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूर

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here