मुंबई भाजपच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठीच ही पत्रकार परिषद घेतली आहे असं सांगत राणे यांनी सुरुवातीपासूनच उद्धव यांना लक्ष्य केलं. ‘माझ्या आयुष्यात महाराष्ट्राचे जे जे मुख्यमंत्री मी पाहिले, त्यांनी भाषण, विचार, काम व कार्याने स्वत:ची प्रतिष्ठा राज्यात व देशात राखली आणि वाढवली. याला अपवाद आताचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण म्हणजे कसलाही ताळमेळ नसलेलं, निर्बुद्ध आणि शिवराळ होतं. कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी कधीही असं भाषण केलं नव्हतं,’ असं राणे म्हणाले.
वाचा:
‘उद्धव ठाकरे यांना काहीच कळत नाही. त्यांचा काहीच अभ्यास नाही. अधिकारीही त्यांच्यावर हसतात. ते खेळण्यातले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आजवर स्वत:च्या हिंमतीवर काहीही केलं नाही,’ असा दावा राणेंनी केला. राज्यात एका वर्षात काय केलं याचा उल्लेख नाही. शेतकऱ्यांची दुरावस्था झालीय. शिक्षणाचा गोंधळ आहे. राज्याची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. करोनामुळं राज्यात सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर बोलण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का?, असा सवाल करतानाच, ‘सुशांतसिंह प्रकरणात स्वत:च्या मुलाला क्लीन चिट देण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला होता,’ असा आरोपही राणेंनी केला.
वाचा:
‘उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री आहेत ते नरेंद्र मोदी यांच्यामुळं. मोदी यांच्या नावावर शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आहेत. नाहीतर २५ आमदारही जिंकले नसते. पुढच्या वेळी १० ते १५ आमदारही येणार नाहीत,’ असा दावाही राणेंनी केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times