परतीच्या पावसाला महाराष्ट्रात आजपासून सुरुवात झाली आहे. प्रखर सूर्यप्रकाश आणि ढगाळ वातावरणात विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांतून, उत्तर- मध्य महाराष्ट्रातील काही भागातून आणि उत्तर कोकणातून आजपासून पावसानं माघार घेतली आहे. परतीच्या पावसाचा हा प्रवास डहाणू, नाशिक, नांदेड आणि नलगोंडा आणि इतर भागांतून होणार आहे. या भागांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसणार असल्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.
महाराष्ट्रासोबतच मान्सूनच्या परतीचा प्रवास हा झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, अरबी समुद्राचा उत्तर भाग, ओडिशा येथूनही होईल. त्यानंतर पुढे वेगाने मान्सून माघार घेईल, अशी शक्यता आहे. ईशान्येकडून २१ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत परतीच्या वाऱ्यांनी पुढचा प्रवास केलेला नाही. तर पश्चिमेकडील प्रवास ६ ऑक्टोबरनंतर पुढे सरकलेला नाही. मात्र आता ईशान्येकडून येणारे वारे बंगालच्या उपसागरावर तसेच भारताच्या दक्षिणेच्या टोकापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे पुढील प्रवासाला वेग मिळू शकतो.
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यात गेल्या काही दिवसांपासून उकाड्याचा ताप अधिक जाणवू लागला आहे. मुंबईमध्ये रविवारी सांताक्रूझ येथे ३२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते, तर कुलाबा येथे ३२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. ऑक्टोबरच्या अखेरीस ‘ऑक्टोबर हीट’च्या झळा जाणवू लागल्याची भावना त्यामुळे मुंबईकरांमध्ये निर्माण झाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times