करोना संसर्गामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. व्यवसाय, उद्योगधंद्यांना पुन्हा गती येत आहे. मात्र, याच काळात चोरटेही सक्रीय झाले आहेत. बंद घरांना लक्ष्य करून घरफोड्या केल्या जात आहेत. घराबाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणे आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. वाहन अडवून लूटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सोमवारी दुपारी सांगलीतून जयसिंगपूरकडे निघालेल्या दुचाकीवरील महिलेची पर्स चोरट्यांनी हिसकावली. यामुळे रस्त्यावर पडून महिला गंभीर जखमी झाली. विटा येथे कुंडल रोडवर एका वृद्धाच्या गळ्यातील २५ ग्रम सोन्याची चेन खेचून चोरट्याने पोबारा केला. खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथे मेंढ्या घेऊन शेतात निघालेल्या शेतकऱ्याला दमदाटी करून चोरट्यांनी चार मेंढ्या पळवल्या. भरदिवसा घडणाऱ्या या लुटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत वाहनचोरीचे दीडशेहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. घरफोडी, चोरीचे ५०, तर लुटमारीचे ३५ गुन्हे दाखल झाले आहेत. सोमवारी जिल्ह्यात पाच दुचाकी चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या. लगडेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीची चोरी झाली. सांगली-मिरज रोडवर एका मोबाइल शोरुमच्या बाहेर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. मिरजेतील वानलेसवाडी येथे रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी, कुपवाड एमआयडीसीमध्ये एका कारखान्याबाहेर लावलेली दुचाकी, तर विश्रामबाग येथे एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी झाली. चोरीच्या वाढलेल्या घटनांच्या पर्श्वभूमीवर गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. लॉकडाउनमध्ये बेरोजगारी वाढल्याने गुन्ह्यात वाढ होत असल्याचे पलिस अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times