संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी लष्कराच्या वरिष्ठ कमांडर्सशी संवाद साधला. सध्याची सुरक्षा स्थिती योग्यरित्या हाताळल्याबद्दल राजनाथ यांनी लष्कराचं कौतुक केलं. पूर्व लडाखमध्ये चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान त्यांचं हे वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे. सोमवारी सुरू झालेल्या चार दिवसांच्या लष्कराच्या वरिष्ठ कमांडर्सच्या परिषदेत चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषा (LAC) तसंच जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबाबत भारताच्या युद्धाच्या तयारीचा आढावा घेण्यात येत आहे.
‘लष्काराला शस्त्रास्त्रांनी अधिक बळकट करण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले. नवी दिल्ली येथे लष्करी कमांडर्स परिषदेला संबोधित केलं. ‘ सध्याच्या सुरक्षा वातावरणात भारतीय सैन्याने उचललेल्या पावलांचा आपल्याला अत्यंत अभिमान आहे, असं राजनाथ म्हणाले.
पूर्व लद्दाखमध्ये एलएसीवर मे महिन्यापासून तणावाची स्थिती आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात ५ महिन्यांहून अधिक काळापासून तणाव आहे आणि दोन्ही बाजूंनी ५०-५० हजारा पेक्षा जास्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. यावरून तणाव कीती टोकाला गेला आहे, हे स्पष्ट होतं. तणाव दूर करण्यासाठी दोन्ही बाजूंनी अनेकदा चर्चेच्या फेऱ्या झाल्या. पण अजूनही तोडगा निघू शकलेला नाही.
‘सैन्यातील सुधारणा आणि सर्व क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी प्रत्येक सुविधा उपलब्ध करण्यास संरक्षण मंत्रालय कटिबद्ध आहे. सशस्त्र दलांचे बाहू अधिक बळकट करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही’, अस राजनाथ सिंह म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times