मुंबई इंडियन्सला गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यापूर्वी ११ सामन्यांमध्ये मुंबईने सात विजय मिळवले होते, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण त्यावेळी मुंबईचा संघ १४ गुणांसह अव्वल स्थानावर होता. या सामन्यात मुंबईने विजयासह दोन गुणांची कमाई केली. त्यामुळे या गुणतालिकेत १६ गुण पटकावणारा मुंबई हा पहिला संघ ठरला आहे. या १६ गुणांसह मुंबईने आपला बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे बाद फेरीतील प्रवेश निश्चित करणारा मुंबई हा या आयपीएलमधील पहिला संघ असेल.
आरसीबीच्या संघाला या सामन्यात मुंबईकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यापूर्वी आरसीबीच्या संघाने ११ सामने खेळले होते. या ११ सामन्यांमध्ये त्यांनी सात विजय मिळवले होते, तर त्यांना चार सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यापूर्वी आरसीबीचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. या सामन्यातील पराभवानंतरही आरसीबीने आपले गुणतालिकेत दुसरे स्थान कायम राखले आहे. सध्याच्या घडीला आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे प्रत्येकी १४ असे समान गुण आहेत. पण नररेट जास्त असल्यामुळे आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे, तर दिल्लीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव यावेळी चांगलाच तळपल्याचे पाहायला मिळाले. मुंबईचे फलंदाज एका टोकाकडून बाद होत असताना सूर्यकुमारने झुंजार अर्धशतक साकारले आणि संघाला डाव सावरला. सूर्यकुमारच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईने आरसीबीच्या संघावर पाच विकेट्स राखून सहजपणे विजय मिळवला. आरसीबीने यावेळी मुंबईपुढे विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. सूर्यकुमारच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने हे आव्हान लीलया पेलले. सूर्यकुमारने यावेळी ४३ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची खेळी साकारली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times